विद्यापीठीय संशोधनाला दिशाच नाही
By Admin | Updated: February 14, 2016 02:55 IST2016-02-14T02:55:53+5:302016-02-14T02:55:53+5:30
आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही.

विद्यापीठीय संशोधनाला दिशाच नाही
नितीन गडकरी : ‘संशोधनातून पुनरुत्थान’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
नागपूर : आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही. येथे होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना उपयोगच होत नाही व यासाठी प्रयत्नदेखील दिसून येत नाही. मुळात या संशोधनांना दिशाच मिळालेली नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, असे परखड मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळातर्फे ‘व्हीएनआयटी’ येथे आयोजित ‘संशोधनातून पुनरुत्थान’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी केंद्र शासनाच्या ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ.विजय कुमार सारस्वत, खा.अजय संचेती, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय महामंत्री वामन गोगटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात संशोधन होत आहे. परंतु त्याचा उपयोग समाजाला कसा होईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी उद्योगक्षेत्राशी समन्वय व संवाद वाढवायला हवा. स्थानिक मुद्यांच्या आधारावर संशोधन झाले तर त्याचा फायदा जास्त प्रमामात होईल व यातून रोजगारनिर्मितीदेखील होऊ शकते. शहरीकरणामुळे ग्रामीण भारत व शहरांमधील दरी वाढत आहे. संशोधनातूनच या समस्येचे निराकरण होऊ शकते. अगदी टाकावू वस्तूलादेखील किंमत मिळवून देण्याची क्षमता संशोधनात आहे. याअगोदर ते अनेकदा सिद्धदेखील झाले आहे. त्यामुळे विविध चर्चासत्रे, परिषदांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालविण्यापेक्षा ‘अप्लाईड’ संशोधनावर विद्वानांनी भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
यावेळी परिषदेच्या संयोजक डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांनी परिषदेचा आढावा मांडला. आयोजन सहसचिव डॉ.लीना गहाणे यांनी संचालन केले तर आयोजन सचिव डॉ.अरविंद जोशी यांनी आभार मानले.
परिषदेच्या अखेरच्या दिवश्ी ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ.माधवन नायर, ‘बीएआरसी’चे वैज्ञानिक बी.एन.जगताप, ‘नीरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वटे यांनी मार्गदर्शन केले. ‘इस्रो’मध्ये देशात शिक्षण घेतलेले अनेक वैज्ञानिक आहेत. अवकाशीय विज्ञान हे भारतीय समाजासाठी आशीर्वाद आहे व याची परंपरादेखील लाभली आहे, असे डॉ. माधवन नायर म्हणाले. (प्रतिनिधी)
प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ हवे कशाला?
डॉ.विजय कुमार सारस्वत यांनी यावेळी शिक्षण प्रणाली व धोरणांवर जोरदार टीका केली. विद्यापीठांमधील संशोधनाचा दर्जा घसरला आहे. प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ व प्रत्येक जिल्ह्यासाठी विद्यापीठ हवे, अशी मागणी होत आहे. परंतु याची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. याऐवजी संशोधनाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. अमेरिका व इतर विकसित देशांच्या गरजांवर आपले संशोधन आधारित असते. परंतु आपल्या देशाला कशाची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून संशोधन व्हावे, असे ते म्हणाले. शिवाय आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या धोरणावरदेखील त्यांनी टीका केली. या विद्यार्थ्यांना नववीनंतर अनेक मूलभूत बाबींचे ज्ञान नसते व उद्योगक्षेत्रासाठी असे विद्यार्थी काहीच कामाचे नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.