लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात दरवर्षी सुमारे १.२ कोटी युनिट रक्ताची गरज असते. पण, केवळ ९० लाख युनिट रक्त संकलित होते. त्यामुळे ३० लाख युनिटचा तुटवडा कायम राहतो. परिणामी, पैसे घेऊन रक्तदान करणाऱ्या व्यावसायिक रक्तदात्यांवर रुग्णांना अवलंबून राहावे लागते, ही चिंतेची बाब आहे, असे मत रक्त सुरक्षेचे राष्ट्रीय तज्ज्ञ आणि नॅकोचे माजी संचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी मांडले.
जागतिक रक्तदाता दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'रक्तकोश'सारख्या उपक्रमांमुळे काही सुधारणा झाल्या असल्या, तरी राष्ट्रीय रक्तसंकलन यंत्रणा नसल्यामुळे भारतात एकसंध आणि समन्वयित प्रणाली तयार होत नाही. आजही ५० टक्क्यांपेक्षा कमी रक्तदान हे खऱ्या अर्थाने स्वयंस्फूर्त आहे. उरलेले रक्तदान हे व्यावसायिक किंवा नातेवाइकांमार्फतच होते.
नो शॉर्टेज, नो वेस्टेज' धोरण जाहीरजागतिक रक्तदातादिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यात 'नो शॉर्टेज, नो वेस्टेज' धोरण तत्काळ तयार करून अमलात आणण्याचे आदेश दिले आहेत; जेणेकरून गरजू रुग्णांना योग्य वेळी सुरक्षित रक्त मिळेल आणि नियोजनाअभावी रक्त वाया जाण्याचे प्रमाणही कमी होईल. ते म्हणाले की, स्वातंत्र्यदिवस, प्रजासत्ताक दिन किंवा राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रक्तदान होते. पण सण, उन्हाळा आणि परीक्षा कालावधीत रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो.
स्वयंस्फूर्त रक्तदानामुळे सामाजिक भान वाढतेलाइफलाइन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, स्वयंस्फूर्त रक्तदान केवळ इतरांचे प्राण वाचवत नाही, तर स्वतः रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे मेंदूतील बोन मॅरोला नवीन आणि ताजे रक्त पेशी तयार करण्यास चालना मिळते. शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते आणि सामाजिक भान वाढते.