राजीव सिंह - नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाची अँम्बुलन्स गरज पडल्यास कधीच मिळत नाही, शववाहिनी देखील बंद पडली आहे. ती ही कामी येत नाही. असे असले तरी महापालिका या दोन्ही सेवांच्या शुल्कात वाढ करताना या बाबींचा विचार करीत नाही. या सेवा सुरू ठेवण्यात महापालिका अपयशी ठरली असताना या सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय मात्र महापालिकेने घेतला आहे. दहा वर्षांंपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन केला तर अँम्बुलन्स सेवा उपलब्ध व्हायची. मृतदेह दहन घाटावर नेण्यासाठी शववाहिनी उपलब्ध व्हायची. आता मात्र अशी सुविधा नाही. सध्या अग्निशमन विभागाला फोन करून या सेवांची मागणी केली तर तेथे उपस्थित कर्मचारी सध्या या सेवा उपलब्ध नसल्याचे सांगतो. पूर्वी महापालिकेकडे दोन अँम्बुलन्स व दोन शववाहिका होत्या. देखभाल दुरुस्तीअभावी अँम्बुलन्स व शववाहिका बंद पडल्या. असे असतानाही तत्कालीन आयुक्त संजीव जायस्वाल यांनी ३0 नोव्हेंबर २0११ रोजी अग्निशमन विभागातर्फे अग्निशमन सेवा शुल्कात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही वाढ केली. अडीच वर्षानंतर संबंधित वाढीव दरांना मंजुरी घेण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे स्थायी समितीच्या एकाही सदस्याने अग्निशमन सेवांबाबत विचारले नाही व शुल्कवाढीचा विरोधही केला नाही. नव्या प्रस्तावानुसार अँम्बुलन्स सेवा शहरात मोफत आहे. मात्र शहराबाहेर नेण्यासाठी प्रति किमी १0 रुपयेप्रमाणे भाडे द्यावे लागते. पूर्वी हा दर ७ रुपये होता. रात्रीच्या मुक्कामाचा चार्ज ५0 रुपये प्रति तास प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. शववाहिका देखील शहरात निशु:ल्क आहे. मात्र शहराबाहेर नेण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. महापालिकेला विहिरींची स्वच्छता करण्यासाठी दोन नव्या जीप खरेदी करायच्या आहेत. याची पूर्ण प्रक्रिया झाली आहे. जीप मिळणे बाकी आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून शोरूममधून अग्निशमन विभागापर्यंंत पोहचलेली नाही.
अग्निशमनचे शुल्क आहे, पण सेवा नाही
By admin | Updated: May 28, 2014 01:01 IST