नागपूर : गडचिराेली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर पाेहचलेल्या मान्सूनची इतर जिल्ह्यांना प्रतीक्षा लागली आहे. अशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा जाेर ओसरून काही दिवस उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. ही उघडीप पेरणीसाठी लाभदायक ठरेल, त्यामुळे चांगल्या पावसाने जमिनीला ओलावा आला असेल, तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
गडचिराेली जिल्ह्यात मान्सूनने धडक दिल्याची घाेषणा वेधशाळेने केली असली तरी, त्याच जिल्ह्यात काेरची येथे पडलेला किरकाेळ पाऊस वगळता इतर ठिकाणी पावसाचा थेंबही पडला नाही. इतर जिल्ह्यांमध्ये गाेंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे सर्वाधिक ७३.१ मि.मी., नागपूर जिल्ह्यात कामठी येथे ६६.१ मि.मी. व शहरात २३.६ मि.मी., भंडारा १९ मि.मी., वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर येथे १९.९ मि.मी. पाऊस झाला. इतर ठिकाणी आकाशातील ढगांनी शांतता बाळगली. वर्धा शहरात मात्र गुरुवारी चांगला पाऊस झाला. नागपूर शहरात गुरुवारी सकाळपर्यंत जाेरदार पाऊस झाला. पाऊस पडल्याने पारा घसरून उकाड्यापासून दिलासा मिळेल, असे वाटत हाेते. मात्र गुरुवारी ढगांच्या शांततेत पारा १.९ अंशाने चढून ३७.८ अंशावर पाेहचला. त्यामुळे नागपूरकरांना उकाड्याचा सामना करावाच लागला.
दरम्यान वेधशाळेच्या घाेषणेनुसार गडचिराेली व चंद्रपूरच्या सीमेवर मान्सून पाेहचला आहे. उर्वरित अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकडे मात्र त्याने झेप घेतलेली नाही. अशात मान्सूनपूर्व पावसाचा जाेर यापुढे ओसरणार असून येत्या १० जूनपर्यंत उघडीप मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात नागरिकांना ऊन आणि उकाड्याचाही त्रास सहन करावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.