योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत थंडीची कुडकुड वाढली असताना विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार निवासात थांबलेल्या आमदारांच्या डोक्याचा मन:स्ताप वाढला आहे. कडाक्याच्या थंडीत आमदारांना गरम पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने गिझरच्या पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली आणि वेळेवर बैठकांना जाता आले नाही असा मुद्दा विधानपरिषदेत समोर आला.
अमोल मिटकरी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनअंतर्गत हा मुद्दा मांडला. आमदार निवासात मोठ्या प्रमाणावर गैरसोय दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी वीज खंडीत झाल्याने गिझर बंद पडले. त्यामुळे ऐन घाईच्या वेळेला अनेक आमदारांची गैरसोय झाली. काही आमदार मोठ्या हॉटेलात राहत असले तरी अनेक जण अद्यापही आमदार निवासातच थांबलेले आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी मिटकरी यांनी केले. असे विषय हे दालनात येऊन मला किंवा सचिवांना सांगता येतात. तुम्ही तर जुने सदस्य आहात. त्यामुळे सभागृहात असे मुद्दे उठवता व त्याला प्रसिद्धी मिळते. मात्र तरीदेखील याची गंभीर दखल घेऊन संबंधितांना सूचना देण्यात येईल, असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. यावर सेनेचे अनिल परब यांनीदेखील हा मुद्दा लावून धरला. मागील तीन दिवसांपासून गिझर बंद असल्याचा दावा त्यांनी केला.
लॉबीतून आमदारांनाच जायला जागा उरेनाअधिवेशन काळात विधानभवनात गर्दी होते. नागपुरातील विधानभवन तुलनेने लहान आहे. विधीमंडळातील लॉबीत मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असतात. त्यामुळे आमदारांना जायलादेखील जागा उरत नाही. त्यामुळे याबाबत कारवाई करावी, अशी मागणी विक्रम काळे यांनी केले. राज्यातील लोक लांबून निवेदने घेऊन येत असतात. शिष्टमंडळांना आमदारांच्या सांगण्यावरूनच पासेस दिले जातात. मात्र लॉबीत गर्दी होणार नाही याची सूचना देण्यात येईल, असे उपसभापतींनी स्पष्ट केले.