लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामुळे सोमवारी शहरातील एका प्रेमीयुगुलाचे पुनर्मिलन झाले. या प्रेमीयुगुलाने लग्न केले असून, प्रेयसीच्या वडिलाने तिला बळजबरीने स्वतःच्या घरात डांबून ठेवले होते. त्यामुळे प्रियकराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकरणावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील प्रेयसी २५ वर्षे वयाची असून, वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवीधर आहे. प्रियकर व्यावसायिक आहे.
या प्रेमीयुगुलाने स्वः मर्जीने २१ डिसेंबर २०२३ रोजी लपून लग्न केले. परंतु, त्याची कुणकुण प्रेयसीच्या वडिलांना लागली व ते आक्रमक झाले. त्यांनी दोघांनाही ठार मारण्याची धमकी देऊन प्रेयसीला घरात डांबून ठेवले. त्यानंतर प्रियकराने तिला सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले; पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी त्याने उच्ब न्यायालयात याचिका दाखल केली.
प्रेयसीला न्यायालयात आणलेन्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी प्रेयसी व तिच्या वडिलाला न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने प्रेयसीची सुरक्षा व गोपनीयता कायम ठेवण्यासाठी तित्त्यासोबत चेंबरमध्ये संवाद साधला. त्यावेळी प्रेयसीने स्वः मीन लग्न केल्याचे सांगून प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे न्यायालयाने या प्रेमीयुगुलाचे पुनर्मिलन घडवून आणले व जीवाला धोका असेपर्यंत दोघांनाही सुरक्षित घरात (रवी भवन) ठेवण्याचा आदेश राज्य सरकारला दिला.
काय आहे सुरक्षित घर?जीवाला धोका असलेल्या कुटुंबांना पोलिस सुरक्षेत राहण्यासाठी सर्व राज्यांमध्ये सुरक्षित घरे स्थापन करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 'शक्ती वाहिनी' प्रकरणामध्ये दिला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरक्षित घरांसदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यातील सुरक्षित घरांच्या यादीमध्ये नागपुरातील स्वी भवनचा समावेश करण्यात आला आहे.