पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:01+5:302021-02-05T04:59:01+5:30

नागपूर : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी वर्ग १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात येतात. एकदा पुस्तके दिल्यानंतर ...

Textbooks will be reused | पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर

पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर

नागपूर : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी वर्ग १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात येतात. एकदा पुस्तके दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याचा वापर होत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकाची मागणी बालभारतीला करावी लागते. परंतु यावर्षीपासून शासनाने पाठ्यपुस्तकाचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या विद्यार्थ्यांचे चांगल्या अवस्थेत असलेले पुस्तक पुढील सत्रातील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची पाठ्यपुस्तकांची मागणी कमी होणार आहे. शासनाचा पुस्तकांच्या निर्मितीवर होणाऱ्या खर्चालाही लगाम बसणार आहे.

यासंदर्भात शासनाने शिक्षण विभागाला निर्देश दिले असून, पाठ्यपुस्तकातून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येत असल्याचा दाखला दिला जात आहे. मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यावर राज्य शासन दरवर्षी २५० कोटी रुपयांंपेक्षा अधिक खर्च करते. काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्यरीतीने जपणूक करतात, पुस्तके सुस्थितीत ठेवतात. यावर्षी तर अद्याप पहिली ते आठवीचे वर्ग कोरोना प्रादुर्भावामुळे उघडलेच नाहीत. नागपूर जिल्ह्यातील १५३५ शाळांना जून २०२० मध्ये ५ लाख ७१ हजार पाठ्यपुस्तकांचे वितरण केले होते. अद्यापही शाळा उघडल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके उघडूनच बघितली नाहीत. अशा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके पुढच्या सत्रात शाळा परत घेणार आहे. चांगल्या अवस्थेत असलेली पुस्तके नवीन सत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक काढून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागांना सुस्थितीत असलेल्या पुस्तके पुनर्वापरासाठी जमा करण्याचे निर्देश दिले आहे. पाठ्यपुस्तके जमा करण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून जमा करण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्वही पटवून सांगावे. कोणत्याही पालकांवर अथवा विद्यार्थ्यांवर पुस्तके जमा करण्यासाठी सक्ती करू नये, असेही परिषदेने शिक्षण विभागाला सुचविले आहे.

- पाठ्यपुस्तकांची मागणी कमी होणार

जमा झालेल्या पुस्तकांची स्थिती लक्षात घेऊन पुढील सत्रात तेवढ्या पुस्तकांची मागणी कमी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंशत: अंध विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेली लार्ज प्रिंट पुस्तके व अंध विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली ब्रेल लिपीतील पुस्तकांचे किती संच जमा करायचे निर्देश परिषदेने दिले आहेत.

Web Title: Textbooks will be reused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.