परीक्षा विभागाची रात्रभर कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 07:13 IST2015-11-25T07:13:08+5:302015-11-25T07:13:08+5:30
संलग्नीत महाविद्यालयांनी केलेल्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

परीक्षा विभागाची रात्रभर कसोटी
नागपूर : संलग्नीत महाविद्यालयांनी केलेल्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालादेखील सहन करावा लागला. विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षा प्रवेशपत्रे उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांच्या परीक्षेची व्यवस्था करणे यासाठी परीक्षा विभागातील अनेक कर्मचारी रात्रभर कार्यालयातच होते. शिवाय मंगळवारी सकाळी ६ पासून प्रवेशपत्रांचे वाटपदेखील सुरू झाले. केवळ एका महाविद्यालयामुळे संपूर्ण परीक्षा यंत्रणा वेठीस धरल्या गेली, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली असून, मंगळवारपासून परीक्षांच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. मागील आठवड्यापासून दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील ‘बीएस्सी’ (मॉलिक्युलर बायोलॉजी), एमकॉम तसेच इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा प्रवेशपत्रासाठी महाविद्यालयात विचारणा करण्यात येत होती. परंतु कर्मचाऱ्यांकडून विद्यापीठाकडे बोट दाखविण्यात येत होते.
अखेर सोमवारी महाविद्यालय परिसरात दोनशेहून अधिक विद्यार्थी एकत्र आले. यासंदर्भात परीक्षा नियंत्रकांकडे विचारणा केली असता, या विषयांचे महाविद्यालयाकडून संलग्नीकरणच घेण्यात आले नसल्याची बाब समोर आली. ऐनवेळी हा प्रकार समोर आल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. अखेर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी विद्यार्थीहितासाठी ऐनवेळी संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा अर्ज स्वीकारण्याची भूमिका घेतली.
ऐन सायंकाळी हा निर्णय झाल्यामुळे अर्ज स्वीकारणे, प्रवेशपत्रे तयार करणे, परीक्षा केंद्रांची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिकांची व्यवस्था करणे या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण पाडण्यासाठी परीक्षा विभागातील कर्मचारी रात्रभर जागले. बहुतांश जणांची तर रात्री अक्षरश: उपासमारच होण्याचीच वेळ आली होती. अखेर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच पैसे एकत्र करून जेवण मागविले. अनेक महिला कर्मचारीदेखील रात्री १ वाजेपर्यंत विभागात होत्या व सकाळी ६ वाजता परत हजर झाल्या. या तोकड्या वेळेत जितके शक्य होते, त्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
प्रश्नपत्रिकांचा तुटवडा
४महाविद्यालयांनी केलेल्या चुका आणि ऐनवेळी समोर आलेले हे प्रकरण यामुळे प्रश्नपत्रिकांचादेखील तुटवडा निर्माण झाला. जितके परीक्षार्थी असतात त्याहून काही जास्त प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतात. परंतु गेल्या ३ दिवसांत सात हजार परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली. त्यामुळे अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या छायांकित प्रती देण्यात आल्या. तर काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे ‘मेल’ पाठवून त्याचे ‘प्रिंटआऊट’ घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. या प्रक्रियेमुळे काही परीक्षा केंद्रांवर पेपरदेखील तास-दीड तास उशिरा सुरू झाले. ऐनवेळी परीक्षा केंद्र कुठले द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना तर तेच महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आले.