शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

मैदानावरही भारी ठरावी टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

भारतीय क्रिकेट संघात गावसकर, वेंगसरकर, विश्वनाथ, रवी शास्त्री, कपिल देव असा दिग्गजांचा भरणा असायचा तेव्हा, किंवा नंतर तेंडुलकर, सेहवाग, ...

भारतीय क्रिकेट संघात गावसकर, वेंगसरकर, विश्वनाथ, रवी शास्त्री, कपिल देव असा दिग्गजांचा भरणा असायचा तेव्हा, किंवा नंतर तेंडुलकर, सेहवाग, गांगुली, द्रविड वगैरेच्या काळातही संघाचा पराभव झाला की फक्त कागदावर भारी संघ अशी संभावना व्हायची. नंतर वलय नसलेले खेळाडू वर्ल्ड कप जिंकू लागले तेव्हा हटकून जुन्यांची आठवण होऊ लागली. हे आठवायचे कारण म्हणजे बुधवारी झालेला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारचा बहुचर्चित विस्तार. बारा मंत्र्यांना बाहेरचा रस्ता ते जवळपास निम्मे नवे चेहरे हा विचार करता भाजपच्या सात वर्षांच्या सत्ताकाळातला हा सर्वांत मोठा मंत्रिमंडळ विस्तार. त्याची गुणात्मक व संख्यात्मक अनेक वैशिष्ट्ये आहेत. नवे चेहरे तरुण असल्याने आता मोदी मंत्रिमंडळाचे सरासरी वय साठीच्या आत, आधीच्या ६१ वरून ५८ पर्यंत कमी झाले आहे. हे मंत्रिमंडळ आता उच्चशिक्षितही बनले आहे. सहा डॉक्टर, सात पीएच. डी. धारक, तेरा वकील, पाच अभियंते, सात माजी सरकारी अधिकारी व परदेशात व्यवस्थापनशास्त्र शिकलेले तिघे अशी ७७ जणांच्या मंत्रिमंडळात ही संख्या चाळिशीच्या पुढे जाते. अकरा महिला मंत्री आहेत. संख्यात्मक वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. अनुसूचित जातींमधील बारा, आदिवासींमधील आठ, ओबीसींचे पंतप्रधानांसह २७ मंत्री या मोदींच्या संघात आहेत. हे सगळे बदल २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक नजरेसमोर ठेवून करण्यात आल्याचे मानले जाते. महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे असे भाजप प्रवाहाबाहेरच्यांना स्थान देण्यामागेही त्या त्या राज्यांमधील राजकीय गणिते व तीन वर्षांनंतरचे निवडणूक नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे काही अपवाद वगळता ते राजकीय नेत्यांच्या परंपरागत, पठडीबद्ध प्रशासकीय कौशल्यावर फारसे विसंबून राहात नाहीत. त्याऐवजी राजकीय वर्तुळाबाहेर सनदी अधिकारी व इतरांमधील गुणवत्तेचा शोध घेत राहतात. त्यामुळेच परराष्ट्र सचिव राहिलेले एस. जयशंकर देशाचे परराष्ट्रमंत्री होतात. आताही अत्यंत महत्त्वाचे रेल्वे मंत्रालय त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन राज्यसभेत आलेल्या आश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपविले आहे. थोडक्यात, मोदींचा नवा संघ सगळ्या दृष्टींनी भारी आहे. सरकारपुढच्या आव्हानांचा विचार केला तर मात्र हे भारीपण सध्या कागदावरच आहे. प्रत्येक मंत्र्याला पुढच्या तीन वर्षांत ते प्रत्यक्ष कारभारात सिद्ध करावे लागणार आहे. आरोग्य व शिक्षण कधी नव्हे इतके जिव्हाळ्याचे बनले असताना, कोरोना महामारीचा सामना करताना भारताची झालेली पुरती दमछाक, गंगेत वाहून जाणारी प्रेते, खाटा व ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गेलेले जीव, जगभर नाचक्की, लसीकरणात पिछाडी या पृष्ठभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व त्यांचे राज्यमंत्री हटविण्यात आले. नवे आरोग्यमंत्री व्यवसायाने डॉक्टर नाहीत. रमेश पोखरियाल निशंक व संजय धोत्रे हे मनुष्यबळ व कौशल्य विकासाचे थोरले व धाकटे मंत्री बाहेर गेले. सोशल मीडियाला वठणीवर आणू पाहणारे कायदामंत्री रविशंकर प्रसाद गेले. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचाही लाल दिवा गेला. याचा अर्थ सगळ्या चुकांसाठी हे मंत्रीच जबाबदार होते, असे नाही. वाईटाचे अपश्रेय त्यांचे व चांगल्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना, असे करता येत नाही. त्यामुळे बारा जणांना मंत्रिमंडळातून वगळणे ही मोदींनी केलेली दुरुस्ती आहे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळेच फेरबदलानंतरच्या तगड्या संघासोबत पंतप्रधानांनाही यापुढील काळात अधिक काम करावे लागेल. त्यात सर्वांत मोठे आव्हान सर्व देशवासीयांच्या शक्य तितक्या लवकर कोरोना लसीकरणाचे आहे. महामारी व लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, व्यवसाय भयंकर मंदीचा सामना करीत आहेत. लाखो, कोट्यवधींच्या पोटापाण्याचा प्रश्न देशापुढे उभा आहे. आर्थिक आघाडीवर अत्यंत निराशाजनक वातावरण आहे. वित्त मंत्रालय निर्मला सीतारामन यांच्याकडे कायम राहिले असले तरी त्या आघाडीवर खूप काही करावे लागेल. इंधन दरवाढ व महागाईचे मोठे संकट देशातल्या सामान्यांवर कोसळले आहे. गृहिणी व नोकरदार मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची गरज आहे. बेरोजगारीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. मोठी गुंतवणूक, पायाभूत प्रकल्प व त्यातून रोजगारनिर्मितीचे आव्हान मोठे आहे. धार्मिक ध्रुवीकरण, हेडलाईन मॅनेजमेंट या पलिकडे या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिले गेले तरच ही नवी टीम मैदानावरही भारी ठरेल.

--------------------------------------