शिक्षकांचे समायोजन दोषपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:28+5:302021-02-05T04:51:28+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ५२ शिक्षकांचे समायोजन गुरुवारी करण्यात आले, परंतु हे समायोजन दोषपूर्ण असल्याच्या ...

शिक्षकांचे समायोजन दोषपूर्ण
नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ५२ शिक्षकांचे समायोजन गुरुवारी करण्यात आले, परंतु हे समायोजन दोषपूर्ण असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्या आहे.
जिल्हा परिषदेच्या शहरातील काटोल रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूल, पटवर्धन हायस्कूलमध्ये मान्य पदापेक्षा कार्यरत शिक्षकांची संख्या अधिक होती. पटवर्धन हायस्कूलमध्ये विद्यार्थी २ आणि शिक्षक ६ होते, तर काटोल रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ८ पदांची मान्यता असताना १७ शिक्षक कार्यरत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने माध्यमिक विभागाच्या १४ शिक्षकांची व प्राथमिक शाळेच्या अतिरिक्त ठरलेल्या ३८ शिक्षकांचे समायोजन केले. समायोजनात काही शिक्षकांना ज्या पदस्थापना मिळाल्या, त्यावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे.
एका शिक्षकांनी आरोप केला की, भाषा विषय संवर्गात एकूण ९ शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले. समुपदेशनात प्राधान्यक्रमातील तीन शिक्षकांकरिता ३ जागा डिस्प्लेवर दाखविण्यात येऊन समायोजन करण्यात आले. त्यानंतर, सामाजिक शास्त्र संवर्गातील शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आली. त्यानंतर, पुन्हा भाषा संवर्गातील ९ पैकी ६ शिक्षकांना उर्वरित सर्व जागा सामाजिक शास्त्रासह रिक्त दर्शवून उपलब्ध करून देण्यात आल्या. प्राधान्य क्रमाव्यतिरिक्तही शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. एका शिक्षकाचे म्हणणे आहे की, आदिवासी क्षेत्रात सेवा दिलेली असताना, समायोजनाच्या प्रक्रियेत पुन्हा त्याच तालुक्यात पदस्थापना देण्यात आली. पतिपत्नी एकत्रीकरणांतर्गत ३० किलोमीटरच्या आत पदस्थापना देण्याचे शासन धोरण आहे. समायोजनात याचा विचार केला नाही. एका शिक्षकाने आरोप केला की, शाळेच्या पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरत नसतानाही अतिरिक्त केले. अशा काही तक्रारी शिक्षकांच्या आहेत. या संदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.