टँकर ३१०
By Admin | Updated: April 18, 2016 05:10 IST2016-04-18T05:10:36+5:302016-04-18T05:10:36+5:30
उपराजधानीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत ले-आऊ ट व झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. काही भागात नळाचे नेटवर्क

टँकर ३१०
नागपूर : उपराजधानीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत ले-आऊ ट व झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. काही भागात नळाचे नेटवर्क नाही तर काही वस्त्यांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशा वस्त्यांना ३०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला तर बेसा, बेलतरोडी व अन्य गावांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे; असे एकूण ३१० शहर व जिल्ह्यात टँकर सुरू आहेत.
महापालिका क्षेत्रातील परंतु नळाचे नेटवर्क नसलेल्या शहरालगतच्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या वस्त्यांना २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मे महिन्यात ही संख्या २५० ते ३०० वर जाण्याची शक्यता आहे. शहरातील ज्या वस्त्यांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही; तसेच पाईपलाईनच्या टोकाला असलेल्या वस्त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही, अशा वस्त्यांना आॅरेंजसिटी वॉटर वर्क्सच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
अशा टँकरची संख्या ७० आहे. तापमानवाढीसोबतच पाण्याच्या मागणीतही वाढ होते. त्यामुळे मे महिन्यात टँकरच्या संख्येत वाढ होते.
लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम यासाठी टँकरची मागणी होते. एप्रिल-मे महिन्यात अशा टँकरची संख्या अधिक असते. मात्र, धार्मिक कार्यक्रम वा लग्नसमारंभासाठी टँकरची गरज भासल्यास यासाठी पैसे मोजावे लागतात. (प्रतिनिधी)
१९ कोटींचा कृती आराखडा
उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर जिल्ह्यातील ४०० ते ५०० गावांत कमी-अधिक प्रमणात पाण्याची टंचाई निर्माण होते. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. यंदा १९ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा तीन टप्प्यात राबविणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तिसऱ्या टप्प्यातच राबविला, तो अखेरच्या म्हणजेच मे-जून महिन्यातच राबविला जातो, म्हणजे एकप्रकारे ही टंचाईगस्त गावातील पाण्याची टंचाई कृत्रिमच म्हणावी लागेल.
कूपनलिकांचाी भरमार
जिल्ह्यातील टंचाईगस्त गावांत उन्हाळ्याच्या दिवसात १००० ते १२०० कूपनलिका खोदल्या जातात. पाणीटंचाई जाणवते. टंचाईग्रस्त गावांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात उपययोजना केल्या जातात. काही ठिकाणी टँकरने तर कुठे खासगी विहिरींचे अधिग्रहण वा कूपनलिका खोदल्या जातात. टंचाई निवारणाच्या कामावर नागपूर जिल्ह्यात दरवर्षी सात ते आठ कोटींचा निधी खर्च केला जातो. परंतु या गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावली जात नाही. तसेच गेल्या वर्षात पाणीपुरवठा योजनेवर जिल्ह्यात २४ कोटी रु. खर्च करण्यात आले होते.
स्विंिमंग पुलासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर
राज्यातील पाणीटंचाई विचारात घेता बांधकाम व स्विमिंग पुलासाठी पाण्याच्या वापरावर राज्य शासनाने निर्बंध घातलेले आहेत. परंतु नागपूर शहरात स्विमिंगपूल सुरू असून यासाठी शुद्ध पाणी वापरले जाते. परंतु पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणा स्विंिमंग पूल व्यवस्थापनाकडे नसते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. शहरातील स्विमिंग पुलासाठी कोणते पाणी वापरले जात आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र महापालिका प्रशासन अद्याप सुस्त आहे.
बांधकामांना आळा कोण घालणार?
उन्हाळाच्या दिवसात पाणीटंचाई विचारात घेता बांधकांमाना परवानगी दिली नाही. परंतु शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर होत असला तरी त्यामुळे पाण्याची भूगर्भातील पातळी कमी होते. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही बांधकामासाठी वापर केला जातो. त्यामुळे उन्हाळाच्या दिवसात बांधकामासाठी अनुमती दिली जात नाही.
पिण्याच्या पाणीवापराला बंदी
उन्हाळाच्या दिवसात बांधकामासाठी वा स्विमिंग पुलासाठी पिण्याचे पाणी वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे. असा प्रकार आढळलाच तर संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. नगरसेवकांनाही उन्हाळ्यात पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जाणार नाही, यासाठी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
प्रवीण दटके, महापौर