तलाठी बेमुदत संपावर

By Admin | Updated: April 28, 2016 02:58 IST2016-04-28T02:58:14+5:302016-04-28T02:58:14+5:30

तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी बुधवारी अचानक बेमुदत संप पुकारला. त्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले.

Talathi stampede strike | तलाठी बेमुदत संपावर

तलाठी बेमुदत संपावर

प्रशासकीय कामकाज खोळंबले : विना प्रशिक्षण आॅनलाईन काम सोपविले जात असल्याने अडचणी
नागपूर : तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी बुधवारी अचानक बेमुदत संप पुकारला. त्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले. आरटीई व हाऊसिंगसंबंधी कामे पूर्णत: ठप्प पडली.
महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, विदर्भ पटवारी संघ आणि विदर्भ मंडळ अधिकारी संघ यांच्या बॅनर अंतर्गत तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनांतर्गत संप पुकारला. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय आॅनलाईन प्रक्रियेतील कामे सोपविली जात असल्याने होणाऱ्या अडचणीसुद्धा या आंदोलनाचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार तलाठ्यांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे कामाचा बोझा वाढलेला आहे. त्यामुळे तलाठ्यांची संख्या वाढविण्यात यावी. तसेच कुठलेही प्रशिक्षण न देता आॅनलाईन प्रक्रियेतील कामे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत. प्रशिक्षण न मिळाल्याने त्यांना काम करणे कठीण जात आहे. नागरिकांच्याही तक्रारी येत आहेत. याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तहसील कार्यलय परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राजेश चुटे, विलास सावरकर, अतीक शेख, प्रवीण मेश्राम, अमोल सेलव, माधव वाघमारे, शरद बोरकर, गोपाल फुलुंभरकर, स्वाती सोनारकर, अलका मुळक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दुर्लक्ष केल्यानेच संप
संप करण्यापूर्वी आंदोलनकर्त्या तलाठ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे वेळोवेळी निवेदन दिले होते. ११ एप्रिल रोजी राज्यातील तलाठ्यांनी काम बंद करीत हातावर काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त केला होता. १६ एप्रिल रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. परंतु प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. तेव्हा २० एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. २१ एप्रिल रोजी आॅनलाईन कामकाज प्रक्रियेला विरोध केला होता. तरीही प्रशासनाने कुठली कारवाई केली नाही. अखेर २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आला.
तलाठ्यांनी संप मागे घ्यावा
तलाठ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याबाबत शासन व प्रशासन सकारात्मक आहे. सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत तलाठ्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे तलाठ्यांनी आपला संप स्थगित करून चर्चा करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले आहे.

Web Title: Talathi stampede strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.