संतोष आंबेकरची ओळखपरेड घ्या
By Admin | Updated: June 17, 2014 00:49 IST2014-06-17T00:49:22+5:302014-06-17T00:49:22+5:30
श्रद्धानंदपेठ या पॉश वस्तीतील बंगल्यावरील अवैध ताब्याच्या प्रकरणात शहरातील कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकरची दोन दिवसांत ओळखपरेड घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश

संतोष आंबेकरची ओळखपरेड घ्या
हायकोर्टाचे आदेश : बंगल्यावरील अवैध ताब्याचे प्रकरण
नागपूर : श्रद्धानंदपेठ या पॉश वस्तीतील बंगल्यावरील अवैध ताब्याच्या प्रकरणात शहरातील कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकरची दोन दिवसांत ओळखपरेड घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी आंबेकरने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आज, सोमवारी न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांच्यासमक्ष अर्जावर सुनावणी झाली. दरम्यान, आंबेकरला ओळखपरेड घेतली नसतानाही आरोपी करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. परिणामी न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत.
पराग रामचंद्र गोंधळेकर असे फिर्यादीचे नाव असून ते अमेरिकेत राहतात. श्रद्धानंदपेठ येथील १५ व्या क्रमांकाच्या प्लॉटवर त्यांचा वडिलोपार्जित बंगला आहे. त्यांची बहीण रश्मी व आई बंगल्यात राहात होत्या. त्यांच्या आईला कर्करोग होता. यामुळे ते मार्च-२०११ मध्ये आईला उपचारासाठी अमेरिकेत घेऊन गेले. आॅक्टोबर-२०१२ मध्ये आईचे निधन झाले. यानंतर फेब्रुवारी-२०१३ मध्ये रश्मी नागपुरात आल्या असता त्यांना बंगल्यापुढे संजय कन्स्ट्रक्शनचा फलक लागलेला दिसला. बंगल्यात १० ते १२ गुंड राहात होते. त्यांनी रश्मींना धमकावून परत पाठविले. रश्मीने ही माहिती पराग यांना दिली. पराग मे-२०१३ मध्ये नागपुरात आले असता त्यांना एकंदरीत परिस्थिती पाहून धक्का बसला.
बंगल्याजवळ गुंडांचा घोळका असल्याने ते काहीच बोलले नाही. परिसरातील नागरिकांनी एक व्यक्ती पॉश कारने बंगल्यात येत-जात असल्याची माहिती दिली. काही दिवसांनी एका प्रकरणात संतोष आंबेकरचे छायाचित्र वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. बंगल्यात कारने येणारा व्यक्ती हाच होता, असे नागरिकांनी पराग यांना सांगितले. यावरून आंबेकरला प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.पराग यांनी गेल्या ११ फेब्रुवारी रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यातील माहितीनुसार, पांढराबोडीतील संजय फातोडेने गुंडांच्या मदतीने बंगल्याचा ताबा घेतला.
घराच्या चारही बाजूने संमतीशिवाय पत्र्याचे शेड उभे केले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अर्जदारातर्फे आर. के. तिवारी, तर शासनातर्फे एपीपी राशी देशपांडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)