भररस्त्यावर ४८ घाव घालणारे दोघे न्यायालयाला शरण
By Admin | Updated: May 20, 2014 00:53 IST2014-05-20T00:53:18+5:302014-05-20T00:53:18+5:30
महालच्या राणासन बारसमोर भररस्त्यावर एका तरुणावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी ४८ घाव घालून भयावह खून करणार्या दोन आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च

भररस्त्यावर ४८ घाव घालणारे दोघे न्यायालयाला शरण
नागपूर : महालच्या राणासन बारसमोर भररस्त्यावर एका तरुणावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी ४८ घाव घालून भयावह खून करणार्या दोन आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाची लढाई हरल्यानंतर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयात शरणागती पत्करली. विश्वजीतसिंग वीरसिंग जाधव (३२) रा. कर्नलबाग मॉडेल मिल गेटजवळ आणि आशिष सदाशिव शिर्के (३३) रा. भोसला पॅलेस कोतवाली, अशी आरोपींची नावे आहे. यापूर्वी सीताराम मूलचंद शाहू आणि रजनीश ऊर्फ रॉकी हे पोलिसांना शरण आले होते. या चार आरोपींनी भूखंडाचा वाद आणि जुन्या भांडणावरून हातात तलवार, चॉपर, कुकरी घेऊन २० मे २०१३ रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास सोमवारी क्वॉर्टर येथील रहिवासी रानू विनोद गाढवे (२४) या तरुणाचा निर्घृण खून केला होता. त्याचा गळा कापला होता आणि शरीरावर ४८ घाव घातले होते. मृताचा भाऊ वैभव याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३४, शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून सर्व चारही आरोपींना अटक केली होती. १२ सप्टेंबर २०१३ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयाने या चारही आरोपींना जामीन मंजूर केला होता. या जामीन आदेशाविरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्या. एम. एल. तहलियानी यांच्या एकलपीठाने २५ मार्च २०१४ रोजी अपील मंजूर करून चारही आरोपींचा जामीन रद्द केला होता. न्यायालयाने या चौघांनाही शरण येण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी शाहू आणि रॉकी हे शरण आले होते. तर जाधव आणि शिर्के हे जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे हे दोघे न्यायालयाला शरण आले. (प्रतिनिधी)