लाट ओसरली,थाट कायम
By Admin | Updated: January 10, 2017 01:51 IST2017-01-10T01:51:57+5:302017-01-10T01:51:57+5:30
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आलेली भाजपची लाट काहीअंशी ओसरल्याचे चित्र नगर परिषदेच्या

लाट ओसरली,थाट कायम
नागपूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आलेली भाजपची लाट काहीअंशी ओसरल्याचे चित्र नगर परिषदेच्या निकालानंतर पुढे आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असताना, हेवीवेट नेत्यांची टीम असताना भाजपला जिल्ह्यात एकतर्फी मुसंडी मारता आली नाही. ९ पैकी ५ नगर परिषदेत नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आल्याने काहीअंशी भाजपचा थाट कायम राहिला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेसने ‘हात’ मारला. काटोलमध्ये ‘देशमुखी’ मोडित निघाली. सावनेर, खापा, कळमेश्वरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार यांचा तर उमरेडमध्ये जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा फुगा फुटला. रामटेकचा गड शिवसेनेकडे कायम राखणे माजी आ. आशिष जैस्वाल यांना जमले नाही. कामठी व मोहप्याने काँग्रेसची लाज राखली. तर काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’ व नरखेडमध्ये नगर विकास आघाडीने बाजी मारत भाजपचा विजयरथ रोखला. कामठीची निवडणूक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. येथे भाजप व माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत (बरिएमं) युती होती. बरिएमंचे अजय कदम यांनी भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर नगराध्यक्षाची निवडणूक लढविली. मात्र, काँग्रेसचे शहाजहाँ शफाअत यांनी त्यांचा पराभव केला. भाजपमधून बाहेर पडलेले विद्यमान उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांच्या उमेदवारीचा मोठा फटका भाजपला बसला. येथे नगरसेवकाची एक जागा जिंकत एमआयएमने खाते उघडले. विधानसभा निवडणुकीतही बावनकुळे कामठीतून मागे होते, हे विशेष.
काटोलमध्ये
‘विदर्भ माझा’
काटोलमध्ये भाजपातून बाहेर पडलेले चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या उमेदवारांना राजकुमार तिरपुडे यांच्या ‘विदर्भ माझा’ या पक्षाच्या चिन्हावर लढवीत २३ पैकी १८ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर यांनी शेकापच्या अर्चना देशमुख यांना मात दिली. भाजपच्या डॉ. प्रेरणा बारोकर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना येथे खातेही उघडता आले नाही. भाजपचे आ. आशिष देशमुख यांच्या गळाला फक्त एक जागा लागली. शेकापला चार जागा मिळाल्या. विदर्भाच्या नावावर नव्यानेच स्थापन केलेल्या पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आल्याने विदर्भवाद्यांचे मनोबल उंचावले आहे.
केदारांना दे धक्का
सावनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान काँग्रेसचे आ. सुनील केदार यांच्या कार्यकक्षात एकूण चार नगर परिषदेत निवडणूक होती. यापैकी केवळ मोहपा येथे काँग्रेसची सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असल्याने जमेची बाजू ठरली. सावनेर, खापा आणि कळमेश्वर या तिन्ही ठिकाणी केदारांच्या काँग्रेसच्या उमेदवारांना विजयापासून रोखण्यात भाजपला यश मिळाले. खापा नगर परिषदेत मतदारांनी सत्तांतर करण्याला पसंती देत सर्वाधिक १७ पैकी १५ नगरसेवकांसोबतच नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका मोहटे यांना संधी दिली. सावनेरात भाजपच्या रेखा मोवाडे तर कळमेश्वरात स्मृती इखार यांचा विजय झाला.
आशिष जयस्वालांचा गड गेला
रामटेक नगर परिषदेतील सत्ता टिकवून ठेवण्यात शिवसेनेला अपयश आले. तेथे केवळ शिवसेनेला दोन जागा पदरात पाडून घेता आल्या. नगराध्यक्षपदही हातातून गेले. काँग्रेसलाही दोन जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आशिष जयस्वाल यांना पराभूत व्हावे लागले. अडीच वर्षांनंतर ते या पराभवाचा वचपा काढतील, असेच सर्वांनाच वाटत असताना त्यांना भाजपला धक्का देता आला नाही. उलट भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करीत शिवसेनेच्या गडाला हादरा देण्याची ‘गनिमी काव्या’ची तयारी करून ठेवली होती. त्याची पुसटशी कल्पना शिवसेनेला न आल्याने गाफील अवस्थेत असलेल्या शिवसेनेचा गड काबीज करण्यात भाजपला तेवढ्या अडचणी आल्या नाहीत.
राजेंद्र मुळक सपशेल अपयशी
माजी मंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यावर अख्ख्या जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीची जबाबदारी होती. त्यामानाने त्यांचे प्रयत्न खूपच अपुरे पडले. सर्वाधिक लक्ष त्यांनी गृहक्षेत्र उमरेडकडे दिले होते. तेथे काँग्रेसची गेल्या १० वर्षांपासून सत्ता आहे. मात्र ही सत्ता टिकविण्याची किमया यावेळी त्यांना साधता आली नाही. भाजपच्या लाटेत उमरेडचा किल्लाही ढासळला. २५ पैकी अवघ्या ६ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर भाजपने १९ जागा काबीज करीत मुळकांना धक्का दिला. जिल्ह्याचा विचार करता मोहप्यात काँग्रेसला यश मिळाले, त्याचे बऱ्याच अंशी श्रेय हे राष्ट्रवादी काँग्रेसला जाते. तर कामठीत भाजपची झालेली फाटाफूट, दोन समुदायामध्ये विभागलेली मते, विरोधी गटाची मते खाण्यासाठी रणजित सफेलकर यांच्या रूपाने मिळालेला उमेदवार ही काँग्रेसच्या विजयाची कारणे ठरली. मुळकांनी उमरेडनंतर सर्वाधिक लक्ष कामठीकडे केंद्रित होते, त्याचा काही प्रमाणात फायदा झाला की स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलेल्या कामाचा फायदा यापैकी कोण वरचढ हे सध्याच सांगता येणार नाही. काँग्रसेकडे असलेल्या मोहपा, उमरेड, खापा यापैकी केवळ मोहप्यातील सत्ता टिकविण्यात काँग्रेसला यश आले. दुसरीकडे उमरेड, खापा येथील सत्ता मात्र कायम राखता आली नाही.
पक्ष हरला; मेव्हणा जिंकला!
भाजपचे आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील काटोल आणि नरखेड या दोन्ही नगर परिषदेत भाजपचा अक्षरश: सुपडा साफ झाला. दोनपैकी एकाच नगर परिषदेत केवळ एका नगरसेवकावर भाजपला विजय मिळाल्याने तोंडाला पाने पुसल्या गेली. आ. देशमुख यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन नेत्यांनी काटोल येथील वादात आ. देशमुखांची बाजू घेतल्याने चरणसिंग ठाकूर यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची होती. परंतु चरणसिंग ठाकूर यांनी विदर्भ माझा पक्षाच्या माध्यमातून देशमुखांना पाणी पाजले. काटोलमध्ये केवळ एका जागेवर भाजपला यश मिळाले. नरखेडमध्ये मात्र एकही जागा ताब्यात घेता आली नाही. विशेष म्हणजे, नरखेडमध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती केली होती. नरखेड येथे देशमुखांच्या पक्षाच्या विरोधात चक्क त्यांचे मेव्हणे अभिजित गुप्ता हे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात काँग्रेसचे बंडखोर म्हणून उतरले होते. त्यांनी नगर विकास आघाडीकडून बाजू सांभाळली. विशेष म्हणजे, गुप्ता यांच्या विजयासाठी आ. देशमुख यांच्या पत्नी व अभिजित गुप्ता यांच्या भगिनी डॉ. आयुश्री देशमुख यांनीही प्रचार केला. सरतेशेवटी तेथे गुप्ता निवडून आले आणि भाजपचे पानिपत झाले. काटोल मतदारसंघातील काटोलसह नरखेडमध्ये ‘कमळ’ फुलण्याआधीच कोमेजले.