उन्हाळी सुट्या संपल्या, हायकोर्ट आजपासून सुरू
By Admin | Updated: June 8, 2015 02:55 IST2015-06-08T02:55:28+5:302015-06-08T02:55:28+5:30
मुंबई उच्च न्यायालय आणि संलग्नित नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून ८ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे.

उन्हाळी सुट्या संपल्या, हायकोर्ट आजपासून सुरू
नवीन रोस्टर लागू : दर गुरुवारी अंतिम सुनावणी
नागपूर : मुंबई उच्च न्यायालय आणि संलग्नित नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून ८ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नेहमीप्रमाणे बदल करण्यात आला आहे. नवीन रोस्टरनुसार नागपूर खंडपीठात तीन युगल न्यायपीठे कार्य करणार आहेत.
युगल न्यायपीठांपैकी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्याकडे १९९८ पर्यंतच्या, २०००, २००२, २००४, २००६ ते २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका, सर्व लेटर्स पेटंट अपील्स, सर्व जनहित याचिका आणि २०११ ते २०१५ पर्यंतच्या फर्स्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्याकडे सर्व फौजदारी प्रकरणे तर, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांच्याकडे अन्य न्यायपीठांना दिल्या नाहीत अशा दिवाणी रिट याचिका, सर्व कौटुंबिक न्यायालय अपील्स व २०१० पर्यंतच्या फर्स्ट अपील्सचे कामकाज सोपविण्यात आले आहे.
एकलपीठाची सर्व फौजदारी प्रकरणे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्याकडे, फर्स्ट अपील्स, अपील अगेन्स्ट आॅर्डर, सेकंड अपील्स, सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन्स व मिसलेनिअस सिव्हिल अप्लिकेशन्स न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे, २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे तर, २००० पर्यंतच्या, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२ व २०१४ मधील दिवाणी रिट याचिका न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्याकडे राहणार आहेत.
न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे विशेष नेमून दिलेल्या प्रकरणांचे कामकाज राहणार आहे. अंतिम सुनावणीसाठी दाखल प्रकरणांकरिता गुरुवार हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)