'पुन्हा भेटत राहू' असे लिहून विद्यार्थ्याने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:05 PM2020-08-14T23:05:20+5:302020-08-14T23:06:38+5:30
‘पुन्हा भेटत राहू’ असे लिहून ठेवत आई-वडिलांना बाय बाय करून एका १५ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्याचप्रमाणे सीताबर्डी आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही आत्मत्येच्या दोन वेगळ्या घटना घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘पुन्हा भेटत राहू’ असे लिहून ठेवत आई-वडिलांना बाय बाय करून एका १५ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्याचप्रमाणे सीताबर्डी आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही आत्मत्येच्या दोन वेगळ्या घटना घडल्या.
अलंकार नगर दिवाण ले-आऊट येथे राहणारा कौस्तुभ गजेंद्र रामटेके ( वय १५) याने शुक्रवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. कौस्तुभ नववीची परीक्षा पास करून दहावीत गेला होता. त्याचे वडील पेंटिंग करतात तर आई घरकाम करते. रामटेके दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्यांनी आई-वडिलांना यापुढेही भेटत राहू, असे म्हणत बाय-बाय केला आहे. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झालेले नाही. एकुलत्या एक मुलाने अशा पद्धतीने आत्महत्या केल्यामुळे त्याची आई आरती आणि वडील गजेंद्र या दोघांना जबर मानसिक धक्का बसला आहे. शेजारीही हळहळ व्यक्त करीत आहेत. हवालदार शैलेश ठवरे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टीत राहणारे जीवन समारराय वर्मा (वय ६०) यांनी शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
तिसरी आत्महत्येची घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनगरमध्ये घडली. धीरज निळकंठ उमरेडकर (वय ३३) यांनी शुक्रवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ८ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जयश्री धीरज उमरेडकर यांनी दिलेल्या सूचनेवरून शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.