गरीब विद्यार्थ्यांना प्रगतीची उभारी
By Admin | Updated: August 10, 2014 01:30 IST2014-08-10T01:30:43+5:302014-08-10T01:30:43+5:30
गरीब व होतकरू विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या खालावले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व सायकल या दोन्ही गोष्टी मौलिकच आहेत. अशांच्या मदतीला मैत्री परिवार संस्था धावून आली आहे.

गरीब विद्यार्थ्यांना प्रगतीची उभारी
२०० विद्यार्थी दत्तक तर १०० सायकलींचे वाटप : मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम
नागपूर : गरीब व होतकरू विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या खालावले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व सायकल या दोन्ही गोष्टी मौलिकच आहेत. अशांच्या मदतीला मैत्री परिवार संस्था धावून आली आहे. क्रांतिदिनाच्या निमित्ताने शनिवारी ५० शाळांमधील २०० शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक साहाय्यार्थ दत्तक घेण्याचा व १०० विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा अनोखा उपक्र म राबविला आणि विद्यार्थ्यांना प्रगतीची उभारी दिली.
प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सचिव रामभाऊ खांडवे तर मंचावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, संजय नखाते, डॉ. पिनाक दंदे, अरविंद गिरी उपस्थित होते. यावेळी खांडवे यांचे स्वागत सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. खांडवे म्हणाले, विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि मैत्री परिवार ते कर्तव्य पार पाडत आले आहे. देशाचे भवितव्य घडविण्याची ही ‘मैत्री’ उज्ज्वल भविष्याकडे नेणारी आहे. शिक्षण हीच सर्वप्रकारच्या बदलाची जननी आहे. त्याचे महत्त्व या संस्थेने ओळखले आहे. विद्यार्थ्यांना उभारी देणाऱ्या या उपक्रमात सातत्य ठेवा, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक संजय नखाते यांनी केले. ते म्हणाले, मैत्री परिवार संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी शहरातील १०० शाळांमधून संस्कार, करिअर, आरोग्य तपासणी व वाहतूक नियमांवरील जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून सुदृढ समाजनिर्मितीचे कार्य हाती घेतले जाईल. सोबतच घरोघरी जाऊन रद्दी गोळा करण्याच्या उपक्रमातून कॅन्सर, हृदय व थॅलेसेमियाच्या अत्यंत गरजू रुग्णांना औषधोपचार केला जात आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.(प्रतिनिधी)