दोन दिवसाच्या बंदनंतर उसळली तुफान गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:15+5:302021-03-09T04:10:15+5:30

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. ...

The storm surged after a two-day shutdown | दोन दिवसाच्या बंदनंतर उसळली तुफान गर्दी

दोन दिवसाच्या बंदनंतर उसळली तुफान गर्दी

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. त्यानंतर लागलीच सोमवारी उमरेडच्या आठवडी बाजाराचा दिवस असतो. दोन दिवसाच्या बंदनंतर सोमवारी सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इतवारी मुख्य बाजार तसेच लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील भाजीबाजारात तुफान गर्दी उसळली होती. काही जणांनी केवळ दंडात्मक कारवाईच्या भीतीने मास्क घातले होते. असंख्य नागरिकांनी ‘मास्क’ला हनुवटीवरच ठेवणे पसंत केले. काही नागरिकांनी मास्क घातलेच नव्हते. ठराविक अंतराच्या नियमाला तर धाब्यावरच बसविल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले.

आठवडी बाजारात उमरेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ते भिवापूर आणि कुही तालुक्यातीलही लगतच्या गावांमधील हजारो नागरिक येत असतात. नागपूर, कामठी, मौदा आदी ठिकाणांहून ठोक व्यापारीही याठिकाणी येत असतात. या कारणामुळे सोमवारी हजारो नागरिकांची गर्दी छोट्याशा इतवारी परिसरात दिसून आली. तालुका व्यवस्थापन समितीने यावर गंभीरतेने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मागील काही दिवसापासून उमरेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चारचौघात वावरताना नागरिक अजूनही गंभीर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसाच्या बंदमुळे सोमवारसह अन्य दिवशी नागरिकांची चांगलीच गर्दी उसळते. यामुळे शनिवार आणि रविवार बंदच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

नियमावली कठोर करा

आता कुठे व्यवसायाला गती येत होती, अशातच दोन दिवसाच्या बंदमुळे छोट्या व्यावसायिकांसह अनेकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असाच कटू अनुभव आम्हास येत असून आर्थिक फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया अक्षय खानोरकर, सतीश चौधरी, प्रशांत गाडेकर, गिरीश लेंडे, क्षितिज खानोरकर, सचिन कुहीकर, मनोज सदावर्ती, राम आदमने, मुकेश अग्रवाल, अशोक लांजेवार, नितीन डुंभरे, सुमित गजभिये आदींनी व्यक्त केल्या. दोन दिवसाचा व्यापार बंदचा प्रकार बंद करण्यात यावा. वेळेत काही बदल करावयाचा असल्यास तोसुद्धा करण्यात यावा. नियमावली अधिक कठोर करावी, अशीही मागणी व्यक्त होत आहे.

-----

यात डोके कुणाचे?

सोमवारी आठवडी बाजार गावतलावानजीक जुन्या बैलबाजारात भरत होता. अशातच दोन आठवड्यापासून अतिशय अरुंद असलेल्या इतवारी मुख्य भाजीबाजारात हा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या बैलबाजारनजीक सर्व सुविधांयुक्त भव्य परिसरात आठवडी बाजार भरतो. असे असताना अचानकपणे त्या परिसरातील बाजार बंद करून इतवारी मुख्य बाजारात बाजार भरविण्याचा निर्णय घेतला कुणी, असा सवाल विचारला जात आहे.

Web Title: The storm surged after a two-day shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.