दर्जा नगरपंचायतचा; कार्य ग्रामपंचायतचे
By Admin | Updated: April 25, 2016 02:55 IST2016-04-25T02:55:38+5:302016-04-25T02:55:38+5:30
भिवापूरला नगरपंचायतचा दर्जा प्रदान करण्यात आला. त्यामुळे या संस्थेच्या अधिकारात वाढ झाली.

दर्जा नगरपंचायतचा; कार्य ग्रामपंचायतचे
भिवापूरवासीयांच्या समस्या ‘जैसे थे’ : नागरिकांची डोकेदुखी वाढली
शरद मिरे भिवापूर
भिवापूरला नगरपंचायतचा दर्जा प्रदान करण्यात आला. त्यामुळे या संस्थेच्या अधिकारात वाढ झाली. दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या अपेक्षाही उंचावल्या. वर्षभरात नगरपंचायत प्रशासनाने कुठलेही ठोस कार्य तर केले नाही, शिवाय नागरिकांच्या मूलभूत समस्याही सोडविल्या नाही. परिणामी, या नगरपंचायतचा फायदा काय, असा प्रश्न नागरिकांनीच उपस्थित केला.
या नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार सुरुवातीला तहसीलदार शीतलकुमार यादव यांच्याकडे होता. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरातील पथदिवे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आरोग्य, स्वच्छता यासह काही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. थकीत कराची वसुली व्हायला लागल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनातही नियमितता आली. सार्वत्रिक निवडणुकीनंतर या नगर पंचायतला नगराध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती मिळाले. त्यातच कर वसुली थंडावली. उत्पन्नाचा स्रोत मंदावल्याने त्याचा विकास कामांवर विपरीत परिणाम होऊ लागला. मर्यादित निधीमध्ये विविध कामे करणे शक्य नसल्याचे पदाधिकारी नागरिकांना पटवून देण्यात यशस्वी ठरले. या नगरपंचायतला यादव यांच्यानंतर नवीन प्रभारी मुख्याधिकारी मिळाला. परंतु त्यांचे नाव कुणालाही ठाऊक नाही. ते पंधरवड्यातून कधी तरी एकदा कार्यालयात येतात आणि निघून जातात.
वाकलेले खांब अन् फुटलेले बल्ब
अंतर्गत वीजपुरवठा व पथदिव्यांची जबाबदारी नगरपंचायतची आहे. शहरातील अर्ध्याहून अधिक भागातील पथदिव्यांची ‘वाट’ लागली आहे. बहुतांश ठिकाणचे बल्ब फुटलेले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. काही ठिकाणी दोन्ही सोयी असताना पथदिवे सुरू केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारातून मार्ग काढत घर गाठावे लागते.
आठवडी बाजाराचा ‘गोलमाल’
भिवापुरात शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. बाजारचिठ्ठी वसुलीचा कंत्राट तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने पवनी येथील कंत्राटदाराला लिलाव पद्धतीने दिला. बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बाजाराची नियमित साफसफाई करण्याचा ठराव पारित करण्यात आला. वास्तवात, बाजाराच्या साफसफाईकडे कंत्राटदार किंवा प्रशासन कुणीही लक्ष देत नसल्याने सर्वत्र कचरा पडलेला असतो. या कंत्राटाची मुदत सध्या संपली असली तरी बाजारचिठ्ठी वसुली सुरूच आहे. हा कंत्राट स्थानिकांना देण्याबाबत काही मंडळी आग्रही आहेत. याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. भिवापूर नगरपंचायतवर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता आहे. येथे भाजप, बसपा प्रत्येकी तीन व दोन अपक्ष नगरसेवक विरोधात आहेत. विरोधी बाकावर ‘कॉलिफाईड’ व ‘अॅक्टिव्ह’ लोकप्रतिनिधी असूनही ते या संपूर्ण परिस्थितीबाबत गप्प आहेत.