महाराष्ट्र स्वप्नांना सत्यात उतरविणारे राज्य

By Admin | Updated: November 16, 2015 03:17 IST2015-11-16T03:17:15+5:302015-11-16T03:17:15+5:30

मी बिहारचा असलो तरी महाराष्ट्राचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. ही भूमी संतांची, कवी, लेखक, विचारवंत आणि योद्ध्यांची आहे.

State that has come true in Maharashtra dreams | महाराष्ट्र स्वप्नांना सत्यात उतरविणारे राज्य

महाराष्ट्र स्वप्नांना सत्यात उतरविणारे राज्य

अभिनेता खा. शत्रुघ्न सिन्हा : एस. एन. विनोद यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
नागपूर : मी बिहारचा असलो तरी महाराष्ट्राचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. ही भूमी संतांची, कवी, लेखक, विचारवंत आणि योद्ध्यांची आहे. आपण पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात आणण्याची शक्ती या भूमीच्या परंपरेत आहे. महाराष्ट्राचे माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे आणि येथूनच मला यशस्वी होता आले, असे मत प्रसिद्ध अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी व्यक्त केले.
एस. एन. विनोद अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद यांचा अमृतमहोत्सवी सत्कार साई सभागृह, शंकरनगर येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शत्रुघ्न सिन्हा बोलत होते. कार्यक्रमाला लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, जोसेफ राव, व्यावसायिक प्रफुल्ल गाडगे, पौर्णिमा पाटील, माजी आ. एस. क्यू. जमा प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सिन्हा म्हणाले, एस. एन. विनोद बिहारचे असले तरी त्यांची कर्मभूमी ही आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातले रोल मॉडेल ते आहेत. देशाच्या प्रगतीत पत्रकारितेचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विनोदजींसारख्या पत्रकारांची देशाला गरज आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली आणि देश आज जवळपास विकसित देशांच्या शर्यतीत आहे. पण अनेक क्षेत्रात आज भारत ज्या स्थितीवर पाहिजे होता, तेथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. भारत मधुमेहाची राजधानी होतो आहे, गर्भवतींचे जास्त मृत्यू, टीबीचे रुग्ण, नेत्रहीनता वाढते आहे. केवळ आॅटोमिक पॉवरने देशाची प्रगती होणार नाही. त्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेला जागरूक करण्याचे आणि समाजाला उन्नत करणारे पत्रकारही गरजेचे आहेत. विनोद यांचा सत्कार करताना योग्य व्यक्तीचा सत्कार करण्याचे समाधान आहे. एके काळी बिहार संपन्नतेत तिसऱ्या क्रमांकावर आणि प्रशासकीय कामात प्रथम होता. आता तो कुठे आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थानात नेत्रहीनता, कुष्ठरोगांचे प्रमाण वाढते आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
खा. विजय दर्डा म्हणाले, मला मंचावर दोन सत्कारमूर्ती दिसत आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि एस. एन. विनोद. शत्रुघ्न सिन्हा माझे कौटुंबिक मित्र आहेत. ज्यांच्याशी त्यांनी मैत्री केली त्यांच्यासोबत त्यांनी मैत्री टिकविली. विशेष म्हणजे ते ज्योतिषी आहेत. मी, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांची चर्चा सुरू होती. त्यांनी दिल्ली निवडणुकीबाबत केलेले भाकीत खरे ठरले आणि आता बिहारबाबतचेही त्यांचे म्हणणे खरेच झाले. मला नेहमीच दोन भूमिकांमध्ये जगण्याची सवय झाली आहे. कारण मी एक राजकीय नेता आणि पत्रकारही आहे. पत्रकार म्हणून साऱ्या घडामोडींकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहतो. विदर्भाला विनोदजींसारखा संपादक आपण दिला.
राष्ट्रीय विचारांचे हिंदी वृत्तपत्र नागपुरातून निघावे, अशी श्रद्धेय बाबूजींची इच्छा होती. त्यावेळी अनेक नावातून विनोदजींचे नाव समोर आले. त्यांनी पत्रकारितेत निर्भीडता आणली. त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर हिंदी किती सहज-सोपी लिहिता येते, ते दाखवून दिले. लोकमत चालविताना तोटा झाला, पण वृत्तपत्राची प्रतिष्ठा कायम ठेवली. लोकमतच्या सर्व पत्रकारांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचे काम आम्ही केले. संपादकांचा सन्मान करणे मालकाने शिकले पाहिजे. मालकांनी संपादकांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले तरच वृत्तपत्र वाचकांचे होऊ शकते, याचे लोकमत हे उदाहरण आहे. एस. एन. विनोद यांनी हिंदीभाषिक पत्रकारितेला नवा आयाम दिला, त्यामुळेच ते सन्मानाचे अधिकारी आहेत. गिरीश गांधी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पौर्णिमा पाटील यांनी एस. एन. विनोद यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संदेशाची व्हिडिओ क्लिप तर माजी खा. दत्ता मेघे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले.(प्रतिनिधी)

बाबूजींनीच मला घडविले
ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद : लोकमतमध्ये लिखाणाचे संपूर्ण स्वातंत्र्य

संपादक म्हणून १९६१ सालापासून मी काम करीत आहे. १७ आॅगस्ट १९८८ साली लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या आमंत्रणावरून नागपूरला आलो. बाबूजींनी माझ्यावर विश्वास टाकला आणि संपादक म्हणून मला काम करता आले. बाबूजींच्या आशीवार्दाने आणि मार्गदर्शनानेच मला संपादक म्हणून यशस्वी होता आले. त्यामुळे माझे यश मी जवाहरलाल दर्डा यांनाच आज समर्पित करीत आहे, असे सांगताना ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद यांना गहिवरून आले. बाबूजींनी नेहमीच मला राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षा वाचकांची काळजी घ्यायला बाध्य केले. वाचकांचा विश्वास जिंकणारे आणि त्यांचा आवाज असणारे हक्काचे वृत्तपत्र लोकमत झाले पाहिजे म्हणून त्यांचा कटाक्ष होता. यासाठी बाबूजींनी वेळोवेळी मला सूचना केल्या. संपादक असताना त्या काळात निवडणुकाही होत्या. लोकमतचे मालक असलेल्या बाबूजींनी एक दिवस यवतमाळवरून मला फोन केला आणि ‘निवडणुका आहेत, थोडी मदत आम्हालाही करा’अशी विनंती केली. खरे तर ते मला आदेश देऊ शकत होते. पण मालक म्हणून त्यांनी कधीच संपादकीय कामात हस्तक्षेप केला नाही. लोकमतमध्ये संपादक, पत्रकारांना लिखाणाचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे, हे मी अनुभविले आहे. हाच वारसा नंतरच्या काळात लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी सांभाळला आहे. बाबूजींच्या मार्गदर्शनात आज लोकमत खऱ्या अर्थाने वाचकांचे विश्वासाचे, हक्काचे वृत्तपत्र झाले आहे. वृत्तपत्राची विश्वसनीयता कायम राहावी म्हणून बाबूजी आग्रही होते. त्याचप्रमाणे ही विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी खा. विजय दर्डा यांचीही प्रशंसा एस. एन. विनोद यांनी केली. बाबूजींनी माझ्यावर विश्वास टाकून मला संपूर्ण स्वातंत्र्य दिले नसते तर मला हे यश गाठताच आले नसते. लोकमतशिवाय मला यशस्वी होताच आले नसते. त्यामुळेच माझे यश मी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना समर्पित करतो, असे एस. एन. विनोद म्हणाले.

 

Web Title: State that has come true in Maharashtra dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.