नव्या वर्षात नाटकांच्या तालमींना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:44+5:302021-01-04T04:07:44+5:30
- शुभास्ते पन्थान: : व्यावसायिकतेला दिली जातेय चालना- बड्या कलावंतांचेही होतेय आगमन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १७ मार्च ...

नव्या वर्षात नाटकांच्या तालमींना प्रारंभ
- शुभास्ते पन्थान: : व्यावसायिकतेला दिली जातेय चालना- बड्या कलावंतांचेही होतेय आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १७ मार्च २०२० पासून सांस्कृतिक कार्यक्रमांना कोरोना संसर्गाचा जो लगाम लागला, तो ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत कायम होता. परवानगी मिळाल्यानंतर गणिते जुळून येत नसल्याने कोणतेही जाहीर सांस्कृतिक कार्यक्रम अद्यापही रंगमंचावर आले नाहीत. मात्र, नव्या वर्षाच्या प्रारंभी जुन्या मळघटांना दूर सारत कलावंत सिद्ध झाले आहेत. नाटकांच्या तालमींना प्रारंभ झाला आहे. एकामागोमाग एक नाटके आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे जाहीरीकरण व्हायला लागले आहे.
तब्बल साडेनऊ महिने कलावंत कोरोना संसर्गाने लागू झालेल्या टाळेबंदीमुळे रंगमंचापासून लांब राहिले. संसर्गाचा प्रकोप कमी झाला नाही आणि त्याचा परिणाम सांस्कृतिक क्षेत्रावरील टाळेबंदी शिथिल झाल्यावरही कलावंत पुढाकार घेण्यास धजावत नव्हते. आता मात्र कोरोनावरील लस निर्मितीच्या गोड बातम्यांमुळे आणि लसीकरणास परवानगी मिळाल्यामुळे कलावंतांचे सामर्थ्य बळावले आहे. शुभास्ते पन्थान: म्हणत तालमींना सुरुवात झाली आहे. टाळेबंदीचा परिणाम म्हणा वा नवे ध्येयधोरणे म्हणा नागपुरातून प्रथमच एक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. या नाटकात नागपूरच्या प्रथितयश कलावंतांसोबतच हिंदी-मराठी चित्रपट, मालिकांमध्ये दम दाखविणारे कलावंतही तालमींसाठी नागपुरात दाखल होत आहेत. एका धार्मिक व्यावसायिक नाटकाच्या तालमी सुरू असून, या नाटकाचा मुहूर्त नुकताच मेट्रो रेल्वेत अभिनव पद्धतीने झाला. या शिवाय नाट्यपरिषदेच्या महानगर शाखेतर्फे दि. २३ व २४ जानेवारी रोजी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात वेगवेगळ्या शहरांतून आठ एकांकिकांचा सहभाग असणार आहे. यावरून हळूहळूच का होईना, नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांना पुन्हा झळाळी मिळणार आहे.
रसिकांना अजूनही धास्ती
संसर्गाच्या धास्तीपोटी रसिक अजूनही नाटक, सिनेमे बघण्यास बाहेर पडायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्याच कारणाने कोणत्याही जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यास निर्माते आणि कलावंत धजावत नसल्याचे दिसून येते. नाटक लागले तर रसिक येईल का, हा प्रश्न अजूनही ऐरणीचा आहे.
.....