पथक फिरताच पुन्हा अतिक्रमण
By Admin | Updated: November 7, 2016 02:39 IST2016-11-07T02:39:46+5:302016-11-07T02:39:46+5:30
शहरात सीताबर्डी, झाशी राणी चौक, उत्तर अंबाझरी मार्ग, व्हेरायची चौक ते महाराजबाग रोड, धरमपेठ, गोकुळपेठ, सदर गड्डीगोदाम,

पथक फिरताच पुन्हा अतिक्रमण
नागपूर : शहरात सीताबर्डी, झाशी राणी चौक, उत्तर अंबाझरी मार्ग, व्हेरायची चौक ते महाराजबाग रोड, धरमपेठ, गोकुळपेठ, सदर गड्डीगोदाम, कस्तूरचंद पार्क, रेल्वे स्टेशन मार्ग, माऊं ट रोड, लिंक रोड, कामठी मार्ग, कमाल चौक, व्हेरायटी चौक, इंदोरा ते टेकानाका, जरीपटका मेन रोड, महाल, गांधीबाग, सीए रोड, इतवारी, गोळीबार चौक, धंतोली गार्डन, यशवंत स्टेडियम, इमामवाडा, मेडिकल चौक यासह शहरातील विविध भागात ही समस्या आहे.
बाजारभागात वा वस्त्यात फिरून विक्री करण्यासाठी फेरीवाल्यांनी परवाने घेतलेले आहेत. परंतु काही फेरीवाले रस्त्यांवर ठाण मांडून विक्री करतात. अतिक्रमण हटविण्यासाठी पथक धडकताच ज्यांच्याकडे परवाने नाहीत, असे विक्रे ते पळ काढतात. परवाना असल्याने फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करता येत नाही. (प्रतिनिधी)
तातडीने कारवाई व्हावी
शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्ते अरुंद होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर बाजार भरत आहे. त्यामुळे पार्किंगला अडथळा होतो. वर्धा मार्गावरील मेट्रो रेल्वेमुळे उड्डाणपूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु खामला मार्गावरील अतिक्रमण न काढल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची तातडीने कारवाई व्हावी.
कैलास जोगाणी , अध्यक्ष, नागपूर चेम्बर आॅफ कॉमर्स
विकास आराखड्यात सुधारणा व्हावी
लोकसंख्या वाढत असल्याने शहरातील बाजारांची संख्या वाढत आहे. यासोबतच अतिक्रमणाची समस्या वाढत आहे. शासकीय रिकाम्या जमिनीचा वापर फेरीवाल्यांसाठी व पार्किंग झोनसाठी केला जावा. शहरातील फुटपाथ मोकळे व्हावे, यादृष्टीनेही प्रयत्न होण्याची गरज आहे. तसेच अतिक्रमणाला आळा घालण्याची जबाबदारी संबंधितावर निश्चित करण्याची गरज आहे.
तेजिंदरसिंग रेणू, सचिव , विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशन
जागृतीची गरज
शहरातील अतिक्रमण होणारी ठिकाणे निश्चित करण्यात यावी. अतिक्रमण तातडीने हटविले तर ही समस्या कमी होईल. अनेक महिन्यानंतर अतिक्रमण कारवाई झाल्यास अतिक्रमण हटविताना अडचणी येतात. त्यामुळे अतिक्रमण हटविल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. सोबच जनजागृती करण्यात यावी.
अतुल पांडे, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन
स्थायी दुकादारांचेही अतिक्रमण
फेरीवाल्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी फूटपाथवर अतिक्रमण करावे लागते. परंतु बाजारातील बहुसंख्य स्थायी दुकानदारांनीही दुकानापुढील फूटपावर अतिक्रमण केलेले आहे. परंतु प्रवर्तन विभागाकडून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जात नाही. यामुळे बाजार भागातील वाहतूक विस्कळीत होते.
रस्त्यांवर बांधकाम साहित्य
शहराच्या विविध भागातील रस्ते व फुटपाथवर बांधकाम साहित्य ठेवले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. झोनमधील अधिकारी व कर्मचारी संबंधिताना नोटीस बजावतात. परंतु कंत्राटदार व बिल्डर्सवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. अनेक महिने रेती, गिट्टी व बांधकाम साहित्य रस्त्यांवर पडून असते. यामुळे वाहनधारकांना त्रास होतो. परंतु संबंधितावर कारवाई केली जात नाही.