लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती केली आहे. यामध्ये नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची बदली अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे; तर ठाणे येथील मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सौम्या शर्मा यांच्या कार्यकाळात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पराग सोमण यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या क्षेत्रात मोठे काम केले असून, ग्रामीण विकासातही त्यांच्या अनुभवाचा फायदा वर्ध्याला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती महापालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांची बदली उपमहानिदेशक, यशदा, पुणे या पदावर करण्यात आली आहे. प्रशिक्षण संस्था म्हणून 'यशदा' ही राज्याच्या प्रशासकीय प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे, जिथे कलंत्रे यांचा प्रशासकीय अनुभव उपयोगी ठरणार आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत असलेले जितीन रहमान यांची बदली बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये त्यांचा अनुभव आहे.