शासकीय पगारात समाधान

By Admin | Updated: June 10, 2015 03:01 IST2015-06-10T03:01:23+5:302015-06-10T03:01:23+5:30

बल्लमवार सरांना उन्हाळ्याच्या सुटीत किंवा एरव्हीही खासगी ट्युशन क्लासेस घेऊन आर्थिक गणित जुळविता आले असते.

Solution in Government Salary | शासकीय पगारात समाधान

शासकीय पगारात समाधान

विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ‘गणित’ जुळविणारे सर !
नागपूर : बल्लमवार सरांना उन्हाळ्याच्या सुटीत किंवा एरव्हीही खासगी ट्युशन क्लासेस घेऊन आर्थिक गणित जुळविता आले असते. पण मिळणाऱ्या शासकीय पगारात ते समाधानी आहेत. उलट जेवढा पगार मिळतो त्यातुलनेत आम्ही शिकवीतही नाही, असे ते मोकळेपणाने सांगून त्यांनी पगारासाठी रडणाऱ्या व अध्यापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना अप्रत्यक्षपणे चपराकही लगावली.
सर्वच विद्यार्थ्यांची दर शनिवारी गणिताची टेस्ट घेतली जाते. यात आढळलेल्या चुका संबंधित विद्यार्थ्यांना सोडवून दिल्या जातात. शहरातील विविध खासगी ट्युशनमध्ये घेतले जाणारे टेस्ट पेपर, प्रश्नसंच ते मिळवितात. त्यासाठी धडपड करतात व ते प्रश्न आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतात. त्यांची पक्की तयारी करून घेतात. वारंवार गणित सोडवून घेऊन बल्लमवार सर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे गणित पक्के करण्याचा प्रयत्न करतात. सरांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम...!
इतर शिक्षकांनीही घ्यावा पुढाकार
सर्वच शिक्षकांना पगार मिळतो. मात्र, बल्लमवार यांच्यासारखे काही शिक्षक मिळणाऱ्या पगारात समाधान मानून अतिरिक्त अध्यापनाचे काम करतात. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतात.
महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनीही असाच पुढाकार घेतला तर गरिबाघरच्या गुणवंतांनाही पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल. तुम्ही घडविलेला विद्यार्थी एखाद्या मोठ्या हुद्यावर जाऊन जेव्हा तुम्हाला वाकून नमन करेल तो क्षण तुमच्या आयुष्यात कुठल्याही अतिरिक्त मानधनापेक्षा निश्चितच मोठा असेल. (प्रतिनिधी)
उपाशीपोटी कसा करणार अभ्यास?
शिक्षक बल्लमवार यांनी या गरीब विद्यार्थ्यांची आणखी एक अडचण सांगितली. मुलांचे आई-वडील सकाळीच कामावर निघून जातात. ते घरी दुपारी १२ च्या सुमारास परत येतात. शाळा सकाळी ११.४५ ची असते. शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंत घरात स्वयंपाक झालेला नसतो. त्यामुळे ही मुले उपाशीपोटीच शाळेत येतात. दोन पिरेड झाले की मधल्या सुटीत १० मिनिटात घरी जावून जेवण करून येतात. ते उपाशीपोटी कसे शिकणार? ही परिस्थिती माहिती असल्यामुळे ते अभ्यासात चुकले तरी शिक्षा केली जात नाही. अशावेळी आपण त्यांना भूमितीशी संबंधित काही आरेखन काढण्याचे काम सोपवून त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले.
आहारासाठी संस्था, उद्योजकांनी पुढाकार घ्यावा
शालेय पोषण आहाराअंतर्गत ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते. ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी गरीब असतात. त्यांना घरी भोजनही मिळत नाही. त्यामुळे येथील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील संस्था, संघटना, उद्योगपती किंवा महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Solution in Government Salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.