लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. ही संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत ५० टक्के सुद्धा नसून ५५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीपर्यंत काही ठरावीक महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत होती. यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संकेतस्थळाच्या तांत्रिक बिघाडामुळे २१ मे रोजी खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया २६ मेपासून पुन्हा सुरू करण्यात आली, जी ३ जूनपर्यंत चालणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीमध्ये अडथळे येत असल्याने प्रक्रियेला पुन्हा दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातील १९८ कनिष्ठ महाविद्यालयांच्या जवळपास ९८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. गुरुवारी ५ जूनला शेवटच्या दिवशीपर्यंत केवळ ४३,०४० विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली. त्यातील ४१,८१५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले व ४१,१८९ विद्यार्थ्यांनी पार्ट-१ लॉक केले आहेत. ३७,७७४ विद्यार्थ्यांनी पार्ट-२ लॉक करून प्रवेश फेरीसाठी नाव निश्चित केले आहे.
दरम्यान, नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेरीदरम्यानही नोंदणी व पार्ट-१ लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार, असे सांगण्यात येत आहे. ११ तारखेपर्यंत अंतिम यादी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अद्याप प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, शनिवारी प्राथमिक यादी लागल्यानंतर तक्रारींसाठी वेळ देत १० ते ११ तारखेपर्यंत अंतिम यादी लागण्याची व त्यानंतर प्रथम फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.