लघु उद्योजकांनो, येणारा काळ तुमचाच!
By Admin | Updated: August 23, 2015 03:00 IST2015-08-23T03:00:11+5:302015-08-23T03:00:11+5:30
आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल.

लघु उद्योजकांनो, येणारा काळ तुमचाच!
देवेंद्र फडणवीस : लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय परिषदेची सुरुवात
नागपूर : आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल. समोरील मोठ्या संधी लक्षात घेऊन युवाशक्तीच्या कौशल्य विकासावर गुंतवणूक व्हावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. लघु उद्योग भारतीतर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात लघु व मध्यम उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेदरम्यान ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थतज्ज्ञ बजरंगीलाल गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशात सर्वात जास्त रोजगारांची निर्मिती ही लघु उद्योगातूनच होते. देशात उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय २०२० साली भारत हा देशातील सर्वात तरुण देश असेल. त्यामुळे लघु उद्योगांसाठीदेखील अनेक संधी आहेत. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात आणताना युवाशक्तीला कुशल मनुष्यबळात परावर्तित करण्याची गरज आहे. यातूनच सशक्त अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशाच्या आर्थिक स्थितीसमोर आव्हाने असतानादेखील आज स्थिती बदलते आहे. उद्योगजगताच्या विकासासाठी देशात चांगली वाहतूक व्यवस्था व रस्ते असणे आवश्यक आहे. लघु उद्योगांचे महत्त्व लक्षात घेता विविध सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे लघु उद्योजकांसाठी व्याजदरात कपात व्हायला हवी, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. उत्पादन शुल्क कमी करून दर्जा वाढविण्याची क्षमता लघु उद्योगांमध्येच आहे, असेदेखील ते म्हणाले.
राज्यातील लघु उद्योगांना लागणारी वीज कमी दरात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विदर्भ-मराठवाड्याशी संबंधित ‘क्रॉस-सबसिडी’ हटविण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल, असे सांगत विजेचे दर वाढणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यात मोठे उद्योग आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एक मोठा उद्योग आला की लहान उद्योगदेखील सुरू होतात.उद्योग सुरू करण्यासाठी आता ७६ ऐवजी केवळ २५ परवानग्या घ्याव्या लागतात.
लघु उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांचा उपयोग करायला हवा, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला. या परिषदेला देशभरातून ६७२ प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत.
यावेळी आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, लघुभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.व्ही.एस.एस.कृष्णा, राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश मित्तल, भूषण वैद्य, शरद बागची, हेमंत अंबासेलकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नेहरूंमुळे देशातील गरिबी वाढली
देशातील गरिबी वाढण्यासाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे, अशी टीका यावेळी नितीन गडकरी यांनी केली. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारने अर्थव्यवस्थेचे ‘लेफ्टिस्ट मॉडेल’ स्वीकारले. यामुळे उद्योगांचा विकास झालाच नाही व परिणामी देशात गरिबीचे प्रमाण वाढले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ‘मॉडेल’वर सर्व राजकीय मतभेद विसरून विचार होणे आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
विदर्भाच्या विकासासाठी पाच ‘क्लस्टर’
केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी लघुउद्योगांच्या विकासात तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे महत्त्व विषद केले. लघुउद्योगांना चालना देऊन त्यांच्या विस्ताराची आवश्यकता आहे. विदर्भात तर उद्योग क्षेत्राच्या विकासाला प्रचंड वाव आहे. हीच बाब लक्षात घेऊन येथे पाच ‘क्लस्टर’ विकसित करण्यात येत आहे. यात दालमिल क्लस्टर, आॅटो इंजिनिअरींग क्लस्टर, गारमेन्ट क्लस्टर, फ्लाय अॅश क्लस्टर व राईस मिल क्लस्टर यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
लघु उद्योगांमुळेच टिकली देशाची अर्थव्यवस्था
देशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचे मोठे महत्त्व आहे. देशाची अर्थव्यवस्था अनेक संकटे झेलूनदेखील केवळ यामुळेच टिकली आहे. स्वदेशी, स्वावलंबी व विकेंद्रित अर्थतंत्रातूनच विकास शक्य आहे. लघु उद्योगांकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी, असे मत बजरंगीलाल गुप्ता यांनी व्यक्त केले.