साहित्य संघाने घातली जखमांवर हळुवार फुंकर

By Admin | Updated: May 23, 2014 01:08 IST2014-05-23T01:08:59+5:302014-05-23T01:08:59+5:30

यंदाच्या साहित्य संमेलनासाठी विदर्भ साहित्य संघातर्फे प्रभा गणोरकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निवडणुकीत समोर आले. पण त्यांचा पराभव झाला. हा पराभव विदर्भ साहित्य संघाच्या

Slowly blow on the injuries laid by the literature team | साहित्य संघाने घातली जखमांवर हळुवार फुंकर

साहित्य संघाने घातली जखमांवर हळुवार फुंकर

विदर्भ साहित्य संघाची तिमाही बैठक

नागपूर : यंदाच्या साहित्य संमेलनासाठी विदर्भ साहित्य संघातर्फे प्रभा गणोरकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निवडणुकीत समोर आले. पण त्यांचा पराभव झाला. हा पराभव विदर्भ साहित्य संघाच्या जिव्हारी लागला. त्याप्रमाणेच यापूर्वी झालेल्या तीन विश्व मराठी साहित्य संमेलनाला विदर्भ साहित्य संघाचा विरोध होता. टोरॅन्टोच्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मात्र साहित्य संघाने मवाळ भूमिका घेतली आणि मोठ्या उत्साहाने काही साहित्यिकांना या संमेलनासाठी विदेशवारीची संधी दिली. पण घटनाबाह्य म्हणून हे संमेलनच वादात अडकले आणि रद्द झाले. त्यामुळे वैदर्भीय साहित्यिकांची विदेशवारीही रद्द झाली. त्यात अनेकांचे पैसेही अडकले. त्यामुळे साहित्यिकांमध्ये आलेली निराशा, मरगळ झटकून टाकण्यासाठी साहित्य संघाच्या अध्यक्षांनी त्यांच्या जखमेवर हळुवार फुंकर मारून त्यांना एक गोड बातमी देण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखविला. विदर्भ साहित्य संघाची दर तीन महिन्याने एक बैठक होते. नुकतीच ही बैठक पार पडली. साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने एक समिती साहित्य महामंडळातर्फे तयार करण्यात येते. या समितीवर प्रत्येक घटक संस्थांचे दोन प्रतिनिधी पाठविले जातात. या समितीवर निवड होणे महत्त्वाचे मानले जाते. ही समिती साहित्य संमेलनाचे नियोजन करणे, आयोजक संस्थेला भेट देणे, स्थळाची निवड करणे, निमंत्रणे पाठविणे, कार्यक्रम पत्रिका तयार करणे आदी कामे करते. त्यामुळेच या समितीवर घटक संस्थाकडून जबाबदार आणि ज्येष्ठ व्यक्ती पाठविण्यात येतात. बहुतेक कार्यकारिणीतीलच सदस्य या समितीवर पाठविण्याचा प्रघात आहे. संमेलनात घेण्यात येणारे ठराव कुठले आहेत, त्यातले कोणते ठराव घ्यायचे वा टाळायचे, हे नियामक मंडळ ठरविते. या नियामक मंडळावरही समिती सदस्य असतात. त्यामुळेच व्यासंग, अनुभव असणार्‍यांची निवड या समितीवर केली जाते. या समितीवर यंदा विदर्भातून वर्ध्याचे प्रदीप दाते आणि अमरावतीच्या मोना चिमोटे यांची निवड साहित्य संघाने केली आहे. यात प्रदीप दाते आयोजनाच्या बाबतीत अनुभवी आणि धडपडे आहेत. पण मोना चिमोटे या अभ्यासू प्राध्यापक असल्या तरी आयोजन, नियोजनाचा अनुभव त्यांना नाही. कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेताच त्यांच्यावर हा निर्णय थोपविण्यात आल्याने कार्यकारिणी सदस्यांनी निराशा व्यक्त केली. सध्याच्या राजकारणात ‘लार्जर दॅन पार्टी’ असणारे नेते यशस्वी होत आहेत. साहित्य संघाच्या अध्यक्षांनाही कदाचित हीच भूमिका पटली असावी. टोरॅन्टोच्या संमेलनासाठी मोना चिमोटे यांचे नाव साहित्य संघाने समोर केले होते. पण ते संमेलनच रद्द झाल्याने साहित्य संघावरही नामुष्की ओढवली. साहित्यिकांना विदेशात संमेलनासाठी पाठविण्याची तयारी केल्यावर संमेलनच रद्द झाल्याने ज्यांची नावे पाठविली होती ते साहित्यिक निराश झाले. त्यात भरीसभर साईट सिन पाहण्यासाठी भरलेले पैसेही ट्रॅव्हल कंपनीकडे अडकून पडले आहेत. या निराशेतून साहित्यिकांचे पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नातून मोना चिमोटे यांना महामंडळाच्या समितीवर पाठविण्यात आल्याची बोचरी टीका काहींनी खाजगीत व्यक्त केली आहे. तर मोना चिमोटेंना महामंडळावर पाठविण्यात येत असताना टोरॅन्टोसाठी सुचविण्यात आलेली इतर नावे का विचारात घेत नाहीत, असाही सवाल उभा झाला आहे. बैठकीत एका सदस्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ भूमिका घेतली. म्हैसाळकरांचा दबदबा साहित्य संघात सर्वश्रुत आहेच. ही नावे मी सुचविली आहेत. कोण याला विरोध करतो, त्याने समोर यावे, असे आव्हानच त्यांनी दिल्यावर कार्यकारिणी सदस्य शांत झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे कुसुमाग्रज स्मृती विशाखा काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार देण्यासाठी निवड समिती तयार केली जाते. या समितीवर यंदा विदर्भातून प्रभा गणोरकर यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत साधारणत: कार्यकारिणी सदस्यांचीच निवड करण्यात आली आहे. तसा नियम नाही पण प्रघात आहे. याचाच लाभ घेत म्हैसाळकरांनी कार्यकारिणी सदस्य नसलेल्या प्रभा गणोरकर यांचे नाव सुचविले, फायनल केले आणि पाठविलेही. प्रभा गणोरकर विदर्भ साहित्य संघाने सुचविलेल्या उमेदवार होत्या. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याची सल साहित्य संघाला आणि गणोरकरांनाही होती. या समितीवर निवड करून साहित्य संघाने त्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला. आता टोरॅन्टोसाठी ज्यांची नावे पाठविण्यात आली होती, त्या उर्वरित सदस्यांसाठीही साहित्य संघ काही करते का? याची प्रतीक्षा उर्वरित साहित्यिकांना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Slowly blow on the injuries laid by the literature team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.