बोर राज्यातील सहावे टायगर रिझर्व्ह!
By Admin | Updated: May 13, 2014 00:56 IST2014-05-13T00:56:30+5:302014-05-13T00:56:30+5:30
वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्....

बोर राज्यातील सहावे टायगर रिझर्व्ह!
योगेंद्र शंभरकर - नागपूर वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. माहिती सूत्रानुसार, यासंबंधी पुढील आठवडाभरात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वन विभागाने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी पेंच कार्यालयाचे विभाजन करून वनसंरक्षक दर्जाचे नवीन पद निर्माण करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या नवीन पदाला मंजुरी मिळताच बोर व्याघ्र प्रकल्पासह टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्याचा कार्यभार या नवीन अधिकार्यांकडे सोपविला जाईल. मात्र बोर व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य कार्यालय नागपुरातच राहणार आहे. सध्या बोर अभयारण्याचे व्यवस्थापन पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक कार्यालयाच्या अधिकारात आहे. याशिवाय या कार्यालयाकडे पेंच व्याघ्र प्रकल्प, मानसिंगदेव, उमरेड-कर्हांडला, टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्याचीही जबाबदारी आहे. कदाचित हा भार लक्षात घेता, बोर व्याघ्र प्रकल्पासाठी स्वतंत्र वनसंरक्षक कार्यालय तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. अशी झाली घोषणा विदर्भातील नवीन व्याघ्र प्रकल्पासंबंधी माजी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी राज्याच्या वन विभागाला गत सप्टेंबर २00९ मध्ये पत्र पाठविले होते. यानंतर १३ सप्टेंबर २0१३ रोजी जयराम रमेश नागपूर दौर्यावर असताना विदर्भातील नागझिरा-नवेगाव व बोर व्याघ्र प्रकल्प तयार करण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या त्या पत्रावर १८ सप्टेंबर २0१0 रोजी केंद्र सरकारकडून बोर व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यासंबंधी शिफारस करण्यात आली होती. राज्याचा प्रस्ताव वन विभागाने गत काही दिवसांपूर्वी बोरमधील १३ हजार ८१२ हेक्टर वन क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. यानंतर राज्याने तो प्रस्ताव अतिरिक्त महासंचालक (व्याघ्र प्रकल्प) व सदस्य सचिव केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाकडे सादर केला होता.