हरतालिका पूजेला गेलेल्या ६ जणी बुडाल्या
By Admin | Updated: September 5, 2016 02:20 IST2016-09-05T02:20:23+5:302016-09-05T02:20:23+5:30
हरतालिकेच्या पावन पर्वावर गावालगतच्या नाल्यावर गौरी पूजेसाठी गेलेल्या सहा जणींचा बंधाऱ्याच्या शेजारी असलेल्या खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.

हरतालिका पूजेला गेलेल्या ६ जणी बुडाल्या
हिंगणामधील दुर्घटना : बंधाऱ्याजवळील खड्ड्यात पडल्या
हिंगणा : हरतालिकेच्या पावन पर्वावर गावालगतच्या नाल्यावर गौरी पूजेसाठी गेलेल्या सहा जणींचा बंधाऱ्याच्या शेजारी असलेल्या खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये चार तरुणी, एक मुलगी आणि एका महिलेचा समावेश आहे. ही दुर्दैवी घटना हिंगणा तालुक्यातील देवळी (सावंगी) शिवारात रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सहाही जणींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
मृतांमध्ये मंदा नत्थूजी नागोसे (५५), जान्हवी ईश्वर चौधरी (१३), प्रिया रामप्रसाद राऊत (१८), पूजा रतन डडमल (१७), पूनम तुळशीराम डडमल (१८) आणि प्रणिता शंकर चामलाटे (१७) यांचा समावेश आहे. या सर्व हिंगणा तालुक्यातील सावंगी (देवळी) येथील रहिवासी आहेत. रविवारी हरतालिका असल्याने गावातील तरुणी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गावालगतच्या नाल्यावर गौरी घेऊन पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. यावर्षी या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला असून, बंधाऱ्याच्या शेजारी मोठा व खोल खड्डा खोदण्यात आला आहे. पूजा आटोपल्यानंतर प्रिया, पूजा, पूनम, प्रणिता व जानव्ही या खड्ड्यामध्ये आंघोळ करण्यासाठी उतरल्या. त्या पुढे खोल पाण्यात जाताच बुडायला लागल्या. त्यामुळे काठावर असलेल्या तरुणी घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याचवेळी मंदा नागोसे या शेतात जात होत्या. त्यांना या तरुणी बुडत असल्याचे दिसताच त्या या तरुणींना वाचविण्यासाठी पुढे सरसावल्या. दुर्दैवाने या सहाही जणी खोल पाण्यात बुडाल्या. काही वेळातच शेजारी असलेल्या शेतातील शेतकरी व मजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत सहाही जणी बुडाल्या होत्या. माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढले. जानव्ही ही इयत्ता सातवी, प्रिया, प्रणिता व पूनम या अकरावीमध्ये सावंगी (देवळी) येथील दादासाहेब खडसे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होत्या. पूजाने दहावीपासून शाळा सोडली होती. विशेष म्हणजे, या सहाही जणी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. या घटनेमुळे सावंगी (देवळी) गावावर शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. तो एक नाला असून त्यावर बंधारा बांधण्यात आलेला आहे. जलयुक्त शिवारच्या कामाअंतर्गत या बंधाऱ्यात एक १५ फुटाचा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्याची कल्पना नसल्याने मुली त्यात उतरल्या व आपला जीव गमावून बसल्या. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड रोष होता. या कामाची व घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी उचलून धरली. नागरिकांचा संताप लक्षात घेता पालकमंत्री बावनकुळे यांनी लघुसिंचन विभागाच्या बंधाऱ्याचे काम आणि या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती गठित करण्याची घोषणा केली. या समितीमध्ये जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे, माजी जि.प. सदस्य बाबा आष्टणकर, माजी आमदार विजय घोडमारे, सावंगीचे सरपंच पुरुषोत्तम गोतमारे, डीसीपी दीपाली मासुरकर, बाबा येनूरकर, बाळू मालोडे, अनिल क्षीरसागर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
प्रगतीला वाचवण्यात यश
या तरुणींसोबतच प्रगती सुभाष घरत (१८) रा. सावंगी, देवळी, ता. हिंगणा हीदेखील पूजा करण्यासाठी गेली होती. तीही आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरली. ती पाण्यात गटांगळ्या खात असताना काठावरील तरुणींनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याचवेळी रूपराव चौके (रा. सावंगी, देवळी) हा सायकलने शेतात जात होता. त्याने सायकल फेकून पाण्यात उडी घेतली आणि प्रगतीला पाण्याबाहेर काढले. त्यामुळे ती बचावली. प्रगती ही आयटीआयची विद्यार्थिनी आहे.