रेल्वेगाड्यात विकले जातेय साधारण पाणी
By Admin | Updated: May 15, 2014 02:29 IST2014-05-15T02:29:24+5:302014-05-15T02:29:24+5:30
रेल्वेस्थानकावर वॉटर कुलिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु या मशीनने पाणी थंड होत नसल्याची स्थिती आहे.

रेल्वेगाड्यात विकले जातेय साधारण पाणी
नागपूर :
रेल्वेस्थानकावर वॉटर कुलिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु या मशीनने पाणी थंड होत नसल्याची स्थिती आहे. प्रवासी या मशीनवर लिहिलेल्या शितल जल या नावाने जातात. परंतु पाणी थंड नसल्याचे त्यांना कळते. बहुतांश मशीन देणगीदात्यांनी उपलब्ध करून दिलेल्या असून त्यांच्या देखभालीकडे रेल्वे कुठलेच लक्ष पुरवित नसल्यामुळे अनेक मशीनमधून गरम पाणी येत आहे. रेल्वेस्थानकाच्या सर्व प्लॅटफार्मवर थंड पाणी मिळणे बंद आहे.
उन्हाळ्याच्या प्रवासात प्रवाशांना पाण्याची अधिक गरज भासते. अनेकदा पाण्यासाठी प्रवासी एखादे मोठे स्टेशन येण्याची वाट पाहतात. रेल्वे थांबताच प्रवासी नळाकडे धाव घेतात. आपल्याला थंड पाणी मिळावे अशी अनेक प्रवाशांची इच्छा असते. रेल्वेकडून विविध ऋतूसाठी विविध प्रकारची तयारी करण्यात येते. परंतु उन्हाळ्यात वॉटर कुलिंग मशीन दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कुठलीच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वच मशीन बंद असून विविध कंपन्यांनी आपल्या पाण्याच्या बाटल्या विकण्यासाठी वॉटर कुलिंग मशीन बंद केल्यात की काय अशी शंका वर्तवण्यात येत आहे. याशिवाय सिल नसलेल्या बाटलीत पाणी थंड करून विकल्या जात आहे. हे प्रकार थांबविण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. प्लास्टिकच्या बाटल्यात पाणी भरून अनेक अवैध व्हेंडर जनरल कोचसह स्लिपर क्लास कोचमध्येही पाणी विकत आहेत.
यासाठी प्रवाशांनी फेकलेल्या बाटल्या पुन्हा वापरात आणण्यात येत आहेत. परंतु रेल्वेस्थानकावर थंड पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन कुठलेच पाऊल उचलत नाही. अनेक रेल्वेगाड्या दूर अंतरापर्यंत थांबत नाहीत. काही प्रवासी गाडी निघून जाईल या भीतीने गाडीखाली उतरत नाहीत. अनेक गाड्यात पाय ठेवायलाही जागा उरत नाही एवढी गर्दी पाहावयास मिळत आहे. काही वर्षापूर्वी रेल्वेस्थानकावर ट्रॉलीमध्ये माठ ठेऊन गाडी आल्यानंतर स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते प्रवाशांना पाणी भरून देत होते. यामुळे प्रवाशांना सहज पाणी मिळत असे. आईला सामानाजवळ बसवून पाणी घेण्यासाठी आलेल्या राजनांदगाव येथील चंचल देवांगण हिची थंड पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नसल्याचे सांगितले.रेल्वेत स्वस्थ आणि थंड पाणी उपलब्ध करून देण्याची कुठलीच व्यवस्था नाही. रेल्वेच्या उदासीनतेमुळे सील नसलेल्या बाटल्यांची विक्री रेल्वेगाड्यात सुरू असल्याचे मुंबई येथील पार्थी कृष्णन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)