सिकलसेलचे रुग्ण संकटात
By Admin | Updated: June 29, 2015 03:03 IST2015-06-29T03:03:20+5:302015-06-29T03:03:20+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या राज्य प्रमुखाने सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण ....

सिकलसेलचे रुग्ण संकटात
नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या राज्य प्रमुखाने सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण करण्याचे प्रावधान असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु या योजनेत पात्र असलेल्या तब्बल ५० ते ६० सिकलसेलग्रस्तांचे हिप जॉर्इंट बदलविण्यास इस्पितळांनी चक्क नकार दिला आहे. या आजाराचा योजनेत समावेशच नसल्याचे इस्पितळांचे म्हणणे आहे, परिणामी यासारखे अनेक रुग्ण अडचणीत आले आहेत.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला २ जानेवारी २०१२ रोजी पत्र दिले. यात ८५७, ७६७ ते ७७० व ७८० ते ७९९ अन्वये सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण करण्याचे प्रावधान असल्याची माहिती दिली. परंतु या योजनेत पात्र असलेले सिकलसेलचे रुग्ण ज्यांचे हिप जॉर्इंट पूर्णपणे बदलण्याची गरज आहे, त्यांना संबंधित इस्पितळाने उपचारास नकार दिला. योजनेत हा आजारच नसल्याचे सांगितले.
यासंदर्भात सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, योजनेचे राज्य प्रमुख, अभियान संचालक व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रमुखास १६ मार्च २०१४ रोजी पत्र लिहून रुग्णांवरील अन्यायाबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती केली. यासोबतच महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील ४४ सिकलसेलग्रस्त रुग्णांचे ‘हिप जॉर्इंट’ बदलविण्याची यादीसुद्धा सादर केली. धक्कादायक म्हणजे, या पत्रावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त व संचालकांनी असे उत्तर दिले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत येत असलेल्या ९७२ मधील अनुक्रमांक ७६७ ते ७७० मध्ये हिप जॉर्इंटवर शस्त्रक्रिया करणे शक्य असले तरी अद्याप काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नाही.
यामुळे सिकलसेलग्रस्तांसाठी जीवनदायी आरोग्य योजना मरणदायी ठरू पाहत आहे. (प्रतिनिधी)