दुसऱ्या दिवशीही फटका
By Admin | Updated: September 17, 2014 00:58 IST2014-09-17T00:58:35+5:302014-09-17T00:58:35+5:30
आॅटोवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेल्या दुसऱ्या दिवसाच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा सर्वात जास्त फटका आॅटोने

दुसऱ्या दिवशीही फटका
आॅटो बंदला संमिश्र प्रतिसाद : प्रवाशांचे हाल
नागपूर : आॅटोवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेल्या दुसऱ्या दिवसाच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा सर्वात जास्त फटका आॅटोने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सीताबर्डी ते व्हेरायटी चौकातून इतरत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. विशेष म्हणजे, एकीकडे संप सुरू असताना दुसरीकडे विनामीटर धावत असलेल्या १५ आॅटोंवर आरटीओने जप्तीची कारवाई केली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलविलेल्या आॅटो संघटनेच्या बैठकीत कारवाईमध्ये शिथिलता आणण्याची सूचना केली.
आरटीओकडून तीन सीटर आॅटोचालकांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात समितीने दोन दिवस आॅटो बंदचा इशारा दिला होता. सोमवारी पहिल्या दिवशी सुमारे ८० टक्के आॅटोचालक यात सहभागी झाले होते, मात्र आज मंगळवारी सीताबर्डी, व्हेरायटी चौकासह काही महत्त्वाचे चौक सोडल्यास अनेक ठिकाणी प्रवासी घेऊन आॅटो धावताना दिसून आले. मात्र विद्यार्थ्यांची ने-आण करणारे आॅटो दुसऱ्या दिवशीही बंद होते.
यामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानकावर आॅटोरिक्षा फार कमी प्रमाणात होते. दरम्यान, आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आॅटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. यावेळी आरटीओ व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह कामगार नेते मोहनदास नायडू, समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे, चरणदास वानखेडे, कैलाश श्रीपतवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१५ आॅटोंवर जप्तीची कारवाई
ॉटोचालकांचा संप सुरू असताना मीटरनुसार न चालणाऱ्या आॅटोंवर आरटीओचा कारवाईचा धडाका सुरूच होता. मंगळवारी १५ आॅटोरिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत ४०५ आॅटोंवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
आॅटोचालकांचा जल्लोष
तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याच्या निमित्ताने गणेशपेठ येथे आॅटोचालकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी कामगार नेते मोहनदास नायडू, समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली.
दोन-तीन प्रवासी आॅटोंवर कारवाईत शिथिलता
आॅटोंमध्ये दोन किंवा तीन प्रवासी असेल तर कारवाईत शिथिलता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओ आणि वाहतूक विभागाला दिल्याची माहिती आहे. मात्र आॅटो मीटरनेच चालेल यावरही भर दिला.
‘कॅलिब्रेशन’चा आढावा घेणार
जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओला २५ तारखेपर्यंत किती आॅटोचालकांनी मीटरमध्ये बदल (कॅलिब्रेशन) करवून घेतले, याचा आढावा घेण्यास सांगितले. त्यानंतरच नियमानुसार निर्णय घेण्याची सूचना केली.