लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी असूनही हजारो बोगस नियुक्त्या करण्यात आल्याचा गंभीर घोटाळा राज्यभर उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्याची मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी केली आहे.
नियुक्तीसाठी एका एका शिक्षकाकडून ३०-४० लाख रुपये घेण्यात आले, तर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येकी ३-५ लाख घेऊन मान्यता दिल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार झाला असून, पुण्याच्या शिक्षण आयुक्तांनी ५९ अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवणारा अहवाल सादर केला आहे.
दरम्यान, परभणीतील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज्यभरातून बोगस नियुक्ती, शालार्थ आयडी आणि अल्पसंख्याक दर्जा घोटाळ्याच्या तक्रारी वाढत असून, हे प्रकरण शेकडो कोटींचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करणे अत्यावश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे. याचा विचार करता राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी नागो गाणार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
सध्याची एसआयटी मर्यादित
- नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून ५८० बनावट शिक्षक नियुक्त्या व शालार्थ आयडी प्रकरणे समोर आली आहेत.
- संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून, काही अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे.
- नागपूर पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे, मात्र ही तपास फक्त नागपूरपुरती मर्यादित आहे.