सात तरुणांना जलसमाधी
By Admin | Updated: March 23, 2015 02:27 IST2015-03-23T02:27:44+5:302015-03-23T02:27:44+5:30
पिकनिकसाठी तलावावर गेलेले १० पैकी ७ तरुण तलावात बुडाले. यात दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. तिघे सुदैवाने बचावले.

सात तरुणांना जलसमाधी
नागपूर : पिकनिकसाठी तलावावर गेलेले १० पैकी ७ तरुण तलावात बुडाले. यात दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. तिघे सुदैवाने बचावले. रविवारी सायंकाळी वडदजवळच्या मंगरुळ तलावात ही घटना घडली. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तलावाकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, अंधार पसरल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर एकही तरुण बाहेर काढण्यात यश आलेले नव्हते. त्यामुळे या तरुणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सक्करदरा परिसरातील १० तरुण रविवारी सकाळी पिकनिकसाठी मंगरुळ शिवारातील तलावावर गेले होते. तलावाच्या काठावर डोंगा होता. नावाडी नसताना आणि डोंगा चालविण्याचे कौशल्य नसतानाही या तरुणांनी डोंग्यात बसून तो तलावाच्या मध्ये नेला. याचवेळी काही जणांनी सेल्फी काढणे सुरू केले. सेल्फीच्या नादात सर्वच्या सर्व तरुण डोंग्याच्या एकाच बाजूला उभे झाले. त्यामुळे तो पाण्यात उलटला. परिणामी सर्व तरुण पाण्यात बुडाले. तिघांना पोहणे येत असल्यामुळे ते काठावर पोहचले. बाकीचे सात तरुण पाण्यात बुडाले. हादरलेल्या तिघांनी बाजूच्या गावात जाऊन ही घटना सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कुहीच्या पोलीस पथकाला तातडीने तलावावर पोहचण्याचे आदेश दिले. महसूल प्रशासनातील वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी अग्निशमन दलासह आवश्यक ती यंत्रणा घटनास्थळी पाठवली. तत्पूर्वी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने तलावात बुडालेल्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, अंधार पडल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर कोणत्याही तरुणाला तलावाबाहेर काढण्यात यश आलेले नव्हते. (प्रतिनिधी)
अविचारी वृत्तीमुळे झाला घात
तलावात बुडालेल्या तरुणांचा घात अतिउत्साहामुळेच झाला. डोंग्याला (बोट) छिद्र असताना, तो चालविता येत नसताना आणि नावाडी नसताना तसेच पोहणेही येत नसतानाही हे तरुण डोंग्यात बसले. सर्वच्या सर्व फोटोग्राफीसाठी वेडीवाकडी पोजिशन घेऊ लागले. कुणीही कुणाला समजावण्याचा अथवा रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचमुळे सात जीवांचा घात झाला.
बुडालेले तरुण
हर्षल प्रकाश आदमने (वय १८), चेतन प्रकाश आदमने (वय २०), गोवर्धन बापू थोटे (वय १८), राहुल वालोदे (वय २३), राम शिवरकर (वय २४), मकसूद शेख अब्दुल सय्यद (वय २७) आणि बटर (वय २१) अशी तलावात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. यातील हर्षल आयटीआयचा तर, चेतन केडीके कॉलेजचा आणि गोवर्धन (वय १८), गायकवाड पाटील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी होय. मकसूद आॅटोचालक आहे तर, वालोदे एका कंपनीत नोकरी करतो. बटर टोपणनाव असलेल्या तरुणाबाबत माहिती कळू शकली नाही.
आशीर्वादनगरात हळहळ
वस्तीतील सात मुले तलावात बुडल्याच्या वार्तेने आशीर्वादनगरात तीव्र शोककळा पसरली. काही जण घटनास्थळाकडे रवाना झाले तर, मोठ्या संख्येने नागरिक संबंधित तरुणांच्या घरासमोर गोळा झाले. आदमने परिवारातील हर्षल आणि चेतन ही दोन्ही पाण्यात बुडाल्याचे कळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयात अन् शेजारी तीव्र शोककळा पसरली. हर्षल आणि चेतनचे आईवडिल, नातेवाईक या घटनेमुळे सुन्नच झाले. शेजारी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते.
कोहळे पोहचले घटनास्थळी
तलावाच्या पाण्यात बुडालेले सर्व तरुण दक्षिण नागपूर मतदार संघात येणाऱ्या आशीर्वादनगरातील आहे. त्यामुळे वृत्त कळाल्यानंतर आमदार सुधाकर कोहळे रात्री १० वाजता घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील पोलीस अधिकारी आणि गावकऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. लोकमत प्रतिनिधीसोबत भ्रमणध्वनीवर बोलताना त्यांनी घटनास्थळावरची स्थिती सांगितली.
तर्कवितर्क अन् धावपळ
बचावलेल्या एका तरुणाने नागपुरातील आपल्या नातेवाईकाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. जंगलात आडवाटेला असलेले घटनास्थळ शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तेथे फोनही लागत नव्हता. त्यामुळे जास्तच गोंधळ वाढला. तर्कवितर्क आणि अफवांनाही उधाण आले. सर्वत्र चर्चेला उधाण आल्यामुळे पोलिसांपूर्वीच तेथे आजूबाजूूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येत पोहचले. उशिरा रात्रीपर्यंत शोधकार्य सुरूच होते.