सुरक्षा यंत्रणांची ‘क सो टी’
By Admin | Updated: November 23, 2015 02:26 IST2015-11-23T02:26:59+5:302015-11-23T02:26:59+5:30
दहशतवादी हल्ल्याच्या सावटात उपराजधानीत होऊ घातलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणांची ‘कसोटी‘ लागली आहे.

सुरक्षा यंत्रणांची ‘क सो टी’
भारत-द.आफ्रिकेची लढत दहशतवादी हल्ल्याच्या सावटात : अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था
नरेश डोंगरे नागपूर
दहशतवादी हल्ल्याच्या सावटात उपराजधानीत होऊ घातलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणांची ‘कसोटी‘ लागली आहे. या सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट अथवा दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून खेळाडूच नव्हे तर गेल्या तीन दिवसांपासून खेळपट्टी आणि स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरातही सुरक्षेचे अभूतपूर्व उपाय करण्यात आले आहेत.
पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याने जगभरात दहशतवादाची छाया गडद झाली आहे. त्यात मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टर मार्इंड सईद हाफिज याने पुन्हा भारतात हल्ला करण्याचे षड्यंत्र रचल्याचे उघड झाले आहे. कुठेही कोणत्याही क्षणी घातपात घडविला जाऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. नागपूर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचेही वारंवार कळविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, जामठा स्टेडियमवर २५ नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलभोवती सुरक्षा यंत्रणांनी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे.
खेळाडूच नव्हे तर खेळपट्टी भोवतीही नागपूर, वर्धा आणि भंडारा या तीन जिल्ह्याचे बॉम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) तीन दिवसांपासून गराडा घालून आहे. शेजारच्या सर्वच इमारतीची आतून बाहेरून तपासणी केली जात असून, सामन्याच्या दरम्यान इमारतीचा वापर वॉच टॉवरसारखा केला जाणार आहे. स्टेडियमच्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. प्रेक्षकांना आतमध्ये जाताना कोणतीच वस्तू, साहित्य सोबत नेण्यास मनाई केली जाणार आहे. वाहनांचीही कसून तपासणी होणार आहे. (प्रतिनिधी)
प्रशिक्षित फोर्स
सुरक्षेचे सर्वच उपाय करूनही ऐनवेळी आणीबाणीची (इमर्जन्सी) स्थिती निर्माण झाल्यास ती निपटून काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेण्यात येत आहे. पहिल्यांदाच फोर्स वनच्या धर्तीवर प्रशिक्षित केलेले जवान आतबाहेरची स्थिती निपटण्यासाठी सज्ज आहेत. नागपूरसह वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा येथील २ हजार पोलीस अधिकारी कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. सुरक्षेत कसलीही हयगय होणार नाही, याची आपण काळजी घेत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी म्हटले आहे.
सीएम, डीजींचेही लक्ष
उपराजधानीतील कसोटी सामन्यावर सुरक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचेही खास लक्ष राहणार आहे. दहशतवादीच नव्हे तर नक्षलवादी हल्ल्याचीही भीती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था काय आणि कशी उभारणार, त्याचा आढावा घेण्यासाठी डीजींनी सोमवारी मुंबईत बैठक बोलवली आहे. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि ग्रामीणच्या अधीक्षक डॉ. आरती सिंग हे दोन्ही अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.