प्रवेशपत्रासाठी धावाधाव
By Admin | Updated: November 24, 2015 06:23 IST2015-11-24T06:23:07+5:302015-11-24T06:23:07+5:30
परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून परीक्षा प्रवेशपत्र मिळविण्यासाठी धडपड करावी, असा विचारदेखील

प्रवेशपत्रासाठी धावाधाव
नागपूर : परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून परीक्षा प्रवेशपत्र मिळविण्यासाठी धडपड करावी, असा विचारदेखील पालकमंडळी करू शकत नाही. परंतु मंगळवारी परीक्षेला सुरुवात होणार असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत विद्यार्थी ताटकळत असल्याचे दिसून आले. यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या महाविद्यालयातील काही अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेले संलग्नीकरणच नसल्याने विद्यार्थ्यांवर ऐनवेळी मनस्ताप सहन करावा लागला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली असून, मंगळवारपासून परीक्षांच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. मागील आठवड्यापासून दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील ‘बीएस्सी’ (मॉलिक्युलर बायोलॉजी), एमकॉम तसेच इतर विषयाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा प्रवेशपत्रासाठी महाविद्यालयात विचारणा करण्यात येत आहे. परंतु कर्मचाऱ्यांकडून विद्यापीठाकडे बोट दाखविण्यात येत होते. अखेर सोमवारी महाविद्यालय परिसरात दोनशेहून अधिक विद्यार्थी एकत्र आले व प्रवेशपत्राबाबत जाब विचारला. प्रवेशपत्रे ‘आॅनलाईन’ मिळणार असून त्याची ‘लिंक’ उघडत नसल्याचे कारण महाविद्यालयाकडून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात परीक्षा नियंत्रकांकडे विचारणा केली असता या विषयांचे महाविद्यालयाकडून संलग्नीकरणच घेण्यात आले नसल्याची बाब समोर आली. ऐनवेळी हा प्रकार समोर आल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. अखेर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी चर्चा केली. संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही प्राचार्यांनी दिली व मंगळवारी सकाळपासून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्याचे विद्यापीठाकडून मान्य करण्यात आले.(प्रतिनिधी)
संलग्नीकरणाचा घोळ काय?
महाविद्यालयात एखादा विषय सुरू करीत असताना, त्या विषयाचे संलग्नीकरण विद्यापीठाकडून करून घेणे आवश्यक असते. मात्र गत तीन महिन्यांपासून महाविद्यालयाने याबाबत प्रक्रिया पूर्ण केलीच नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नामांकन क्रमांक आले नव्हते व त्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली होती. परंतु समितीचा दौरा बाकी होता, अशी माहिती समोर आली.
विद्यापीठाचे अर्ध्याहून अधिक विभाग ‘आॅफलाईन’
विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाकडून ‘आॅनलाईन’ अर्ज सादर करण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांना बसलेला फटका समोर आला होता. परंतु विद्यापीठाच्या अर्ध्याहून अधिक विभागांकडून ‘आॅनलाईन’ प्रणालीचा वापरच करण्यात आला नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे परीक्षेच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांचे अर्ज ‘आॅफलाईन’ पद्धतीने स्वीकारून त्यांना प्रवेशपत्र देण्यात येत होते. अनेक विभागांनी ‘आॅनलाईन’ अर्ज भरले, परंतु ते ‘इनवर्ड’ न केल्यामुळे प्रक्रिया पूर्ण झालीच नाही. विभागांना विद्यापीठाकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु याला बहुतांश विभागांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. ऐनवेळी अनेकांनी तर चक्क विद्यार्थ्यांना कामाला लावल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. अशी हलगर्जी दाखविणाऱ्या विभागांकडून विलंब शुल्क वसूल करण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.