पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:18+5:302021-03-08T04:08:18+5:30

जागतिक महिला दिन विशेष निशांत वानखेडे नागपूर : आधुनिकतेच्या स्पर्धेत वेगाने धावणाऱ्या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने सजीवसृष्टीची व पर्यावरणाची ...

Scientists working to protect the environment | पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक

पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक

जागतिक महिला दिन विशेष

निशांत वानखेडे

नागपूर : आधुनिकतेच्या स्पर्धेत वेगाने धावणाऱ्या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने सजीवसृष्टीची व पर्यावरणाची घडी मात्र विस्कटली आहे. विस्कटलेले पर्यावरण सुधारण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक अहोरात्र झटत आहेत. प्रत्येक क्षेत्र काबीज करणाऱ्या महिला या संशोधनाच्या क्षेत्रातही मागे नाहीत. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झटणाऱ्या डॉ. अत्या कपले, डॉ. बी. पद्मा राव आणि डॉ. साधना रायलू या वैज्ञानिक म्हणजे जगभरातील अशा समस्त महिला संशोधिकांचे प्रातिनिधिक रूप होय. वेगवेगळ्या संशोधनांच्या माध्यमातून ही भूमी प्रदूषणमुक्त आणि राहण्यायोग्य (लिव्हेबल) ठेवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

डॉ. अत्या कपले

डॉ. अत्या कपले या नीरीमध्ये प्रदूषण नियंत्रण युनिटच्या प्रकल्प प्रमुख आणि रिसर्च सेलच्या संचालिका आहेत आणि गेल्या २५ वर्षांपासून संशोधनाच्या माध्यमातून पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी सेवा देत आहेत. डॉ. अत्या यांनी हैदराबाद येथून विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर रुरकी विद्यापीठातून बॉयोटेकमध्ये एम.एस्सी. व केंद्रीय विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर त्यांनी नीरीमध्ये जाॅइन केले. तेव्हापासून पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक प्रकल्पांचा भाग हाेत्या तर अनेक प्रकल्पांचे नेतृत्व त्यांनी केले. २०१९ मध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या वेळी गंगा नदीसमाेरीला नाले स्वच्छतेचे आव्हान त्यांनी स्वीकारले. या प्रकल्पाचे नेतृत्व केले. जैविक अभियांत्रिकी तंत्राद्वारे त्यांनी नाला शुद्धीकरणाचे कार्य केले. त्यामुळे देशभरात हा प्रकल्प उल्लेखनीय ठरला. तेल कंपन्यांमधून हाेणारे ऑइल प्रदूषण नियंत्रणासाठी त्यांनी चालविलेले संशाेधनही माेलाचे ठरत आहे. नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठीही त्यांच्या टीमद्वारे प्रयत्न केले जात आहेत.

डाॅ. बी. पद्मा राव

नीरीमध्ये गेल्या ३० पेक्षा जास्त वर्षापासून सेवा देत असलेल्या डाॅ. बी. पद्मा श्रीनिवास राव या संस्थेच्या लिगल व पर्यावरण पाॅलिसी विभागाच्या प्रमुख आहेत. त्या मूळच्या नागपूरच्या असून एलआयटी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दीड वर्ष मुंबई येथे एचपीसीएलमध्ये सेवा दिल्यानंतर नीरीमध्ये कार्य सुरू केले. आपल्या सेवा काळात त्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या तज्ज्ञ म्हणून २०० पेक्षा अधिक प्रकल्पांमध्ये संशाेधनाचे कार्य केले. यामध्ये एअर क्वाॅलिटी माॅनिटरिंग, वायू प्रदूषण नियंत्रण, वायू प्रदूषण व्यवस्थापन, पाेल्युशन एमिशन इनव्हेंटरी, पर्यावरणीय ऑडिट, विविध उद्याेगांचे प्रदूषण प्रभाव मूल्यांकनाचे कार्य त्यांनी केले. दिल्ली, मुंबई, काेलकाता, देहरादूनमध्ये प्रदूषणाच्या प्रभावाचा अभ्यास त्यांनी केला. ऑइल रिफायनरीद्वारे चहाच्या मळ्यावर हाेणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी उपाय सुचविला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ५० पेक्षा अधिक पेपर सादर केले. १०० हून अधिक विद्यार्थ्यांना संशाेधनासाठी मार्गदर्शन केले असून, ते विद्यार्थी आज देशविदेशात सेवा देत आहेत. सध्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराच्या प्रकल्पावर त्यांचे संशाेधन सुरू आहे.

Web Title: Scientists working to protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.