शालेय जीवनातच ‘तो’ बनला मुन्नाभाई
By Admin | Updated: July 14, 2015 02:58 IST2015-07-14T02:58:23+5:302015-07-14T02:58:23+5:30
दहावीत प्रवेश घेण्यासाठी एका शाळकरी मुलाने केलेले ‘चौर्यकर्म’ लक्षवेधी ठरले आहे. नववी नापास झालेल्या या

शालेय जीवनातच ‘तो’ बनला मुन्नाभाई
नागपूर : दहावीत प्रवेश घेण्यासाठी एका शाळकरी मुलाने केलेले ‘चौर्यकर्म’ लक्षवेधी ठरले आहे. नववी नापास झालेल्या या विद्यार्थ्याची ‘हुशारी’ पालक, शाळा प्रशासन आणि पोलिसांनाही चक्रावून टाकणारी आहे. अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या आणि चोरी तसेच फसवणुकीचा आरोपी बनलेला हा विद्यार्थी केवळ १५ वर्षे वयाचा आहे.
लकडगंजमधील विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये गेल्या सत्रात तो नववीत शिकत होता. अभ्यास व्यवस्थित न केल्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे पेपर सोडवता आले नाही. त्यामुळे तो नापास झाला.
दरम्यान, या शाळेत जून २०१५ मध्ये चोरी झाली. चोरट्याने शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून कपाटामधील ९ व्या वर्गाचे कोरे प्रगती पुस्तक, एसएससीचे बुक नं. ८ मधील एसी क्र. ७३५ ते ८०० असे कोरे आणि ७०१ ते ७३४ पर्यंत टीसी लिहिलेले पुस्तक, चाव्यांचा गुच्छा आणि मुख्याध्यापिका सरिता भांगरेकर यांच्या सहीचा स्टॅम्प चोरून नेला होता. शाळेच्यावतीने तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. महिनाभराच्या चौकशीत शाळेतून चोरीला गेलेल्या टीसी व प्रगतीपत्राच्या आधारे वर्धमाननगरातील हिंदुस्तान विद्यालयात एका विद्यार्थ्याने दहावीत प्रवेश घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी या शाळेत संपर्क केला. चौकशीत उघड झालेल्या माहितीनंतर शाळा प्रशासनच नव्हे तर पोलिसही चक्रावले.(प्रतिनिधी)
हुशारी अंगलट
४३ मे रोजी नापास झाल्याचे ‘त्याला’ कळले. मात्र, आपण नापास झाल्याचे घरी समजल्यास पालक रागावतील, हे ध्यानात घेऊन त्याने शक्कल लढवली. ज्या शाळेत तो शिकत होता, त्या शाळेत त्याने संबंधित कागदपत्रांची चोरी केली. त्यानंतर ९ वी उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रगतीपत्र आणि टीसी बनविली. त्याआधारे हिंदुस्तान विद्यालय, वर्धमाननगर येथे १० व्या वर्गात प्रवेश घेतला. तो येथे नियमित शाळेतही जाऊ लागला.
गुन्हे दाखल
४पोलिसांच्या चौकशीत विद्यार्थ्याची चोरी आणि बनवाबनवी उघड झाली. दोन्ही शाळेच्या प्रशासनाला ती पोलिसांनी कळविली. त्यामुळे शाळेतर्फे दीपश्री दीपक मुंजे (वय ५७) यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीसोबतच त्याच्यावर फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला. या विद्यार्थ्याचे आता काय करावे, असा प्रश्न पोलीस, शाळा प्रशासन आणि पालकांना पडला आहे.