पश्चिम विदर्भात एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा
By Admin | Updated: May 25, 2014 00:50 IST2014-05-25T00:50:27+5:302014-05-25T00:50:27+5:30
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात या खरीप हंगामात किमान एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता खुद्द कृषी विभागाने वर्तविली आहे

पश्चिम विदर्भात एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा
यवतमाळ : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात या खरीप हंगामात किमान एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता खुद्द कृषी विभागाने वर्तविली आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी उपलब्ध बियाणे वाचविणे आणि नव्या बियाण्यांचा शोध घेण्याची मोहीम कृषी खात्याने हाती घेतली आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यात खरिपाचे ३२ लाख हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यातील १६ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे पाच हजारावर गेलेले भाव लक्षात घेता शेतकर्यांचा कल सोयाबीन लागवडीकडे अधिक आहे. प्रती हेक्टरी ७५ किलो प्रमाणे अमरावती विभागाला १२ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. गेल्या वर्षी अकाली पावसामुळे सोयाबीनचे बियाणे निकृष्ट झाले. एवढेच नव्हे तर महाबीजचे प्लॉटस्ही फेल झाले. चाचणीत या बियाण्यांची उगवण क्षमता ७0 टक्क्यापेक्षा बरीच कमी असल्याचे सिद्ध झाले. महाबीजकडून दोन लाख क्विंटल बियाण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडून केवळ ७0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषी खात्याने केलेल्या सर्वेक्षणात शेतकर्यांकडे साडेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे आढळून आले. तर दहा ते बारा चांगल्या खासगी कंपन्यांकडून साडेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. अशा विविध मार्गाने ११ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असले तरी एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासणार आहे. तो भरुन काढण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. त्यासाठी शेतकर्यांना घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गावागावांत अतिरिक्त बियाणे असलेल्या शेतकर्यांकडून इतर शेतकर्यांनी सोयाबीन बियाणे उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)