सत्य कथन करणे जोखिमीचे
By Admin | Updated: August 10, 2014 01:29 IST2014-08-10T01:29:52+5:302014-08-10T01:29:52+5:30
सत्य कथन करणे अलीकडच्या काळात जोखिमीची बाब झाली आहे. पण सत्य सांगितलेच पाहिजे, असे मत जनता दल (यु.)चे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी व्यक्त केले.

सत्य कथन करणे जोखिमीचे
शरद यादव : राजेंद्र माथूर स्मृती व्याख्यान
नागपूर : सत्य कथन करणे अलीकडच्या काळात जोखिमीची बाब झाली आहे. पण सत्य सांगितलेच पाहिजे, असे मत जनता दल (यु.)चे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा व दैनिक भास्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजेंद्र माथूर स्मृती व्याखानमालेत ते ‘सच, दो टूक सच’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. गिरीश गांधी व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे होते.
यादव यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ यात झालेल्या बदलाकडे लक्ष वेधले. दैववादावर टीका करीत समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी सत्याला देव मानत. पण ते देवाच्या शोधात कधीच फिरले नाही तर त्यांनी सर्वसामान्य माणसात देव शोधला. त्याचे दु:ख निवारण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. आता सर्वच क्षेत्रात चित्र बदलले आहे. आता सत्याची परिभाषाच बदलली. प्रत्येक जण सत्याकडे त्यांच्या नजरेने पाहतो. यात समाजाचा दोष नाही.
समाजाला दिशा देणारे नेतृत्व नाही. त्यामुळे सत्य सांगणे कठीण झाले आहे. पण यामुळे निराश होण्याचे कारण नाही. समाजात काही चांगलेही लोक आहेत व त्यांच्याकडून समाजाला अपेक्षा आहेत, त्यांना शक्ती देण्याची गरज आहे, असे यादव म्हणाले.
देशाने प्रगती केली, असा दावा केला जात असला तरी सत्य वेगळे आहे. आजही विविध क्षेत्रात विदेशी वस्तूंचेच प्राबल्य आहे. विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याने भारतालाही विदेशातील बाजारपेठेवर वर्चस्व स्थापन करण्याची संधी मिळेल,असे सांगण्यात येत असले तरी देशांतर्गत नैसर्गिक साधनसामग्री नष्ट करण्याकडेच सध्या कल आहे. जोपर्यंत देशातील नागरिक सक्षम होणार नाही तोपर्यंत भारत विश्वशक्ती होणार नाही,असे यादव म्हणाले. भारताला सुपर पॉवर करण्याची भाषा एकीकडे केली जात असताना दुसरीकडे समाज आजही दैववाद, जातपात आणि धर्मात अडकला आहे. विषमता आहे. यातून समाजाची सुटका करणे गरजेचे आहे. नवनवीन संशोधन करणे गरजेचे आहे, असे यादव म्हणाले.
यावेळी दत्ता मेघे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद शर्मा यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश दुबे यांनी केले. (प्रतिनिधी)
एनडीए, युपीएचे धोरण सारखेच
सत्तेतून पायउतार झालेली युपीए आणि सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचे आर्थिक धोरण सारखेच आहेत. युपीएनेही विदेशी गुंतवणुकीचा पुरस्कार केला होता. एनडीएही तेच करीत आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व माजी अर्थमंत्री चिदंबरम आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात या बाबीत साम्य आहे, असे शरद यादव म्हणाले. कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातूनच ब्रिटिश भारतात आले व त्यांनी देशावर राज्य केले. स्वातंत्र्यानंतरही आता विदेशी कंपन्यांसाठी भारताने दारे मोकळी केली आहेत, अशी टीका यादव यांनी केली.