सावनेरातील गडकरी स्मृतिस्थळ दुर्लक्षित
By Admin | Updated: January 5, 2017 02:08 IST2017-01-05T02:08:05+5:302017-01-05T02:08:05+5:30
मराठी साहित्य विश्वात उंची गाठलेल्यांमध्ये राम गणेश गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
_ns.jpg)
सावनेरातील गडकरी स्मृतिस्थळ दुर्लक्षित
विदर्भाचे वैभव : निवासस्थान नाट्यगृहाचीही अवस्था दयनीयच
बाबा टेकाडे नागपूर
मराठी साहित्य विश्वात उंची गाठलेल्यांमध्ये राम गणेश गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नाट्य, विनोद, कविता क्षेत्रात त्यांनी आपले नाव कोरले. अवघे ३४ वर्षे जगलेले गडकरी हे जीवनाच्या अंतिम टप्प्यात शेवटचे काही दिवस सावनेरात मुक्कामी होते. ते निवासस्थान आजही शाबूत आहे. मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात यासाठी समाधीस्थळ बांधण्यात आले. एवढेच काय तर त्यांच्या नावाने नाट्यगृहही बांधण्यात आले. ही सर्व स्मृतिस्थळे पुणे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आली आहे. पण आजही तेवढीच उपेक्षित आहे, जेवढी आधी होती. पुण्यातील घटनेमुळे या स्थळांकडे कुणीतरी धाव घेतील, असे वाटत असताना ती आशाही धूसर झाली.
राम गणेश गडकरी यांनी टोपण नावाने साहित्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात लिखाण केले. गोविंदाग्रज या नावाने १५० कविता, बाळकराम या नावाने विनोदी लेख तर राम गणेश गडकरी या नावाने त्यांनी नाटके लिहिली. ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटके खूप गाजली तर यापैकी ‘एकच प्याला’ने नाट्य क्षेत्रातील ‘एव्हरेस्ट’ गाठले.
सुप्रसिद्ध नाटककार, कवी, मराठीचे शेक्सपियर, भाषाप्रभू अशी नामाभिधाने राम गणेश गडकरी यांना लाभली. अवघी ३४ वर्षांची आयुर्मर्यादा लाभलेल्या राम गणेश गडकरी हे जीवनातील शेवटचे काही दिवस सावनेरात वास्तव्यास होते. सन १९१८ च्या अखेरच्या महिन्यात प्रकृती खालावल्याने ते सावनेरात वकिलीचा व्यवसाय करणारे थोरले बंधू विनायकराव यांच्याकडे आले. त्यातच २३ जानेवारी १९१९ ला सावनेरमध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यासोबत आई सरस्वतीबाई, पत्नी रमाबाई व लेखनिक पांडुरंग बापट हेही सावनेरला होते.
सावनेरातील दुमजली घरात त्यांचे बंधू विनायकराव वरच्या माळ्यावर तर रामगणेश गडकरी तळमजल्यावर राहात असत.आजही त्यांची वास्तू जीर्णोद्धाारानंतरही जुनेपण कायम ठेवून आहे. या निवासस्थानी गडकऱ्यांच्या नाट्यातील दृश्यांचे फोटो लावले आहेत. ‘अज्ञाना मरणोत्तर प्रगट ते होईल, तू ते कसे कोठे आणि कधीतरी जगती. मी होऊन गेले असे’ या त्यांच्याच वाक्यपंक्ती एका फलकावर लिहिल्या आहेत.
विशेष म्हणजे गडकऱ्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या जन्मगावी म्हणजे गुजरातमधील नवसारीची माती चिंतामण कोल्हटकरांनी कर्मभूमीत सावनेरला अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणून टाकली. त्यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीची भेट करून दिली.आज सावनेरला राम गणेश गडकरींचा अर्धाकृती पुतळा, कोलार नदीच्या काठावर समाधी, निवासस्थान, नाट्य सभागृह, खुला रंगमंच आदी आहेत. मात्र नाट्य प्रशिक्षण केंद्र आणि गडकरी साहित्य केंद्राची नितांत गरज आहे. गडकऱ्यांच्या या भूमीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे, याकडे शासनाने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. पुढील पिढीला राम गणेश गडकऱ्यांच्या साहित्यांचा अभ्यास करता यावा म्हणून हे अनमोल साहित्य जपणे अत्यावश्यक आहे. हे साहित्य कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. मराठी रंगभूमीतील नाटक एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन आदींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले, हेही तितकेच खरे. (प्रतिनिधी)