सांबराची शिकार; टोळी गजाआड
By Admin | Updated: May 30, 2014 01:04 IST2014-05-30T01:04:21+5:302014-05-30T01:04:21+5:30
हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सांबराची शिकार; टोळी गजाआड
पाण्यात कालवले विष : हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील घटना
धारणी : हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेने मेळघाटात वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिण मालूर या बीटमधील कम्पार्टमेंट नंबर ६१५ व ६४१ च्या मधोमध वाहणार्या नदीपात्रातील पाण्याच्या डबक्यात मालूर (वन) या गावातील तीन आरोपींनी विष (युरिया) कालवून ठेवले होते.
हे विषाक्त पाणी पिल्याने एका सांबराचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वतरूळ अधिकारी व्ही. के. गोंडचवर आणि वनरक्षक शेळके यांनी आरोपी सोमा बिसराम भुसूम (४५) याच्या शेतातील झोपडीची झडती घेतली असता त्यांना सांबराचे ५ क्विंटल ४८0 ग्रॅम मांस मिळाले. याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत या प्रकरणात त्याच्यासोबत शंकर काळमा भुसूम (३0) व तोगेलाल पुन्या भुसूम (२४) यांच्या मदतीने त्याने शिकार केल्याची कबूली वनविभागाला दिली.
याप्रकरणी तिघांना भारतीय वन अधिनियमान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी समक्ष हजर केले असता ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आरएफओ तोरो यांच्या मार्गदर्शनाखाली वतरूळ अधिकारी गोंडचवर व वनरक्षक शेळके करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)