संजय जोशींचे नव्या वर्षांत पुनर्वसन ?
By Admin | Updated: December 29, 2015 20:02 IST2015-12-29T20:02:19+5:302015-12-29T20:02:19+5:30
भाजपमध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले.

संजय जोशींचे नव्या वर्षांत पुनर्वसन ?
भाजपमध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले. काही महिन्यांपूर्वीच नवी दिल्ली व नागपूरसह देशात विविध ठिकाणी संजय जोशी यांची ‘घरवापसी कधी’ असे प्रश्न उपस्थित करणारे ‘पोस्टर्स’ लागले होते. यावरून राष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. परंतु मोदी हे माझे नेते असल्याचे सांगत जोशी यांनी या एकूणच वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
यादरम्यान त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याशी झालेली भेट, संघाच्या विविध कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती आणि नुकतेच गुजरातमधील अहमदाबाद येथे जोशी यांचे झालेले अभूतपूर्व स्वागत या बाबींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहेच.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपामध्ये राष्ट्रीय स्तरावर अंतर्गत बदलांचे वारे वाहू लागले आहेत. बिहार निवडणुकांनंतर पक्षाला मोठा धक्का बसला होता. अशा स्थितीत उत्तर प्रदेश, गुजरात या महत्त्वाच्या राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचे आव्हान आहे.