संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित
By Admin | Updated: August 26, 2014 01:02 IST2014-08-26T01:02:26+5:302014-08-26T01:02:26+5:30
दक्षिण नागपुरातील रिंगरोडवरील संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून

संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित
१५ टक्के रक्कम भरून भूखंड नावावर : छोटू भोयर यांचे मानले आभार
नागपूर : दक्षिण नागपुरातील रिंगरोडवरील संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबीयांच्या नावावर आता ही जागा होणार आहे. ही झोपडपट्टी नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासूनचा प्रस्ताव प्रलंबित होता. यासाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर यांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.
संजय गांधीनगर झोपडपट्टी अधिकृत करून येथे राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर येथील जमीन करण्यात यावी, यासाठी येथील कुटुंबे अनेक वर्षांपासून झटत होती. ही वस्ती अधिकृत नसल्याने येथील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा व विविध योजनेपासून वंचित राहावे लागत होते. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरसेवक सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात डॉ. छोटू भोयर यांना निवेदन दिले होते.
वस्तीतील नागरिकांना स्थायी जागा देण्यासाठी भोयर यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला. नासुप्रच्या जुलैमध्ये झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत भोयर यांनी हा विषय मांडला होता. त्यानंतरही त्यांचा पाठपुरावा कायम होता. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले. या वस्तीचे नियमितीकरण करून नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. नासुप्रतर्फे प्रथमच मूळ भूखंडधारकांना फक्त १५ टक्के रक्कम भरून भूखंड आपल्या नावावर करून घेता येणार आहे. यापूर्वी ही अट २५ ते ५० टक्के रकमेची होती.
या निर्णयामुळे परिसरातील नागरिक आनंदी आहेत. शहरातील उर्वरित अनियमित वस्त्यांचे नियमांप्रमाणे नियमितीकरण करून नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. ही वस्ती अधिकृत झाल्याने परिसरातील नागरिकांनी डॉ. भोयर, नगरसेवक सुधाकर कोहळे, रमेश सिंगारे यांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावेळी राजू घडेकर, सुधाकर बंडारे, सुधाकर मातने, अमोल कारेमोरे, राजू धरमठोक, सुनंदा सावरकर, सुनीता गुरखे, आनंद लुटे, चंद्रमणी खैर, मुकेश माहुरले, राजू बोंदरे, प्रकाश कोरडे, मनीष भोयर, मधुकर मातने, महादेव धरमठोक, वच्छला येरमे, विमल राचलवार, पुष्पा बिसेन, राधिका राघुते, सीता अहिरवार, लीला जांभूळकर, गंगाबाई मोगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)