सद्भावनानगर बनले कचरानगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST2021-02-23T04:12:39+5:302021-02-23T04:12:39+5:30

नागपूर : उपराजधानीचा झपाट्याने कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध सोयीसुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील सद्भावनानगरात नागरिकांना विविध ...

Sadbhavanagar became Kacharanagar | सद्भावनानगर बनले कचरानगर

सद्भावनानगर बनले कचरानगर

नागपूर : उपराजधानीचा झपाट्याने कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध सोयीसुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील सद्भावनानगरात नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासून टाकले आहे. या भागात नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेने त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा निवेदने दिली. तरीसुद्धा अद्याप त्यांच्या मागण्यांवर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.

गटारलाईनमुळे परिसरात दुर्गंधी

गटारलाईनचे चेंबर जागोजागी तुटलेले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहते. परिसरातील नागरिकांना त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाण पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने गटारलाईनची झाकणे दुरुस्त करावीत, या मागणीचे निवेदन नागरिकांनी अनेकदा दिली. परंतु त्यावर काहीच उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सार्वजनिक विहिरीची दुरवस्था, रस्त्यावर बांधकामाचे साहित्य

या भागात अतिशय जुनी विहीर आहे. या विहिरीतून पूर्वी संपूर्ण परिसराला पाणीपुरवठा होत होता. सध्या या विहिरीची दुरवस्था झाली आहे. नागरिकांनी या विहिरीत कचरा टाकल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. या विहिरीची सफाई करावी अन्यथा ही विहीर बुजवून टाकावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत. तसेच या भागातील अंतर्गत रस्त्यावर नागरिकांनी जागोजागी बांधकामाचे साहित्य ठेवलेले असल्यामुळे अपुरा रस्ता रहदारीसाठी उरतो. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येते. महापालिकेने रस्त्यावर ठेवलेले बांधकामाचे साहित्य जप्त करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

गार्डन, सार्वजनिक मैदानाची दुरवस्था

या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. परंतु गार्डनमध्ये कुठलीच खेळणी उपलब्ध नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. तसेच नासुप्रचे समाजभवन या भागात असून, त्याची नियमित देखभाल होत नाही. या समाजभवनात नागरिक कचरा आणून टाकणे, कपडे वाळविणे, बांधकामाचे साहित्य ठेवत असल्यामुळे समाजभवनाची दुरवस्था झाली आहे. परिसरात मोठे मैदान आहे. परंतु या मैदानात असामाजिक तत्त्वांचा उपद्रव राहतो. जुगार खेळणे, दारू पिणे अशी कृत्ये असामाजिक तत्त्व करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

स्ट्रीट लाईट झाडाच्या फांद्यात

परिसरातील झाडे वाढली आहेत. त्यामुळे स्ट्रीट लाईट झाडाच्या फांद्यात अडकले असून रस्त्यावर या स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे वाहनचालकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. त्यासाठी महावितरणने झाडाच्या फांद्या तोडून स्ट्रीट लाईट मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे. या भागात सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे परिसरात कचरा साचून राहतो. महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची मागणी होत आहे.

गटारलाईनची झाकणे दुरुस्त करावीत

गटारलाईनचे चेंबर तुटल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहून दुर्गंधी पसरते. त्यामुळे महापालिकेने तुटलेली गटारलाईनची झाकणे दुरुस्त करण्याची गरज आहे.

- सुनिता वरेकर, महिला

मैदानातील बांधकामाचे साहित्य हटवावे

मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानात नागरिकांनी आपले बांधकामाचे साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे हे बांधकामाचे साहित्य हटविण्याची गरज आहे.

- समीर खान, नागरिक

असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा

परिसरात असलेल्या सार्वजनिक मैदानात असामाजिक तत्त्व गोळा होतात. जुगार खेळणे, दारू पिणे असे कृत्य ते करतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

-हिवराम खापरे, नागरिक

स्ट्रीट लाईट मोकळे करावेत

झाडाच्या फांद्यात अडकल्यामुळे रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडत नाही. वाहनचालक तसेच नागरिकांना अंधारातून मार्ग काढत जावे लागते. त्यामुळे झाडाच्या फांद्या तोडून स्ट्रीट लाईट मोकळे करावेत.

-अमोल आखरे, नागरिक

सफाई कर्मचारी नियमित येण्याची गरज

परिसरात सफाई कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे कचरा साचून राहतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होत असून महापालिकेने नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची गरज आहे.

-शोभा नागमोते, महिला

सार्वजनिक विहिरीची सफाई करावी

सार्वजनिक विहिरीत नागरिक कचरा आणून टाकतात. त्यामुळे विहीर दूषित झाली आहे. महापालिकेने या सार्वजनिक विहिरीची सफाई करून ती नागरिकांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.

-प्रियविंद शहारे, महिला

रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे

रस्त्यावर नागरिकांनी बांधकामाचे साहित्य टाकले आहे. त्यामुळे रहदारीस रस्ता उरत नाही. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची गरज आहे.

-लता वांढरे, महिला

.............

Web Title: Sadbhavanagar became Kacharanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.