दिलासा : राज्यातील सहा लाख शेतकर्यांना फायदा जितेंद्र दखने - अमरावती अकाली पाऊस व गारपिटीमुळे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकर्यांचे सहा महिन्यांचे वीज बिल शासनाने माफ केले आहे. वीजमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्यातील ५ लाख ८७ हजार २४५ शेतकर्यांचे ९२ कोटी ४९ लाख ४१ हजारांचे वीज देयक माफ करण्यात आले आहे. यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये अमरावती विभागातील वीज ग्राहक शेतकर्यांचे २४ कोटी ५ लाख २३ हजार रूपयांचे वीज देयके माफ करण्यात आली आहे. अकाली पाऊस, गारपिटीत शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. यात पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. मोठय़ा प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. त्यामुळे शेतकर्यांना आधार देण्यासाठी शासनाने जानेवारी ते जून २0१४ या सहा महिन्यांचे वीज बिल माफ केले. याविषयी राज्य शासनाने महावितरण व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या याद्या मागवून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातून राज्यातील कोकण व कल्याण वगळता सर्व विभागातील ५ लाख ८७ हजार २४५ शेतकर्यांना याचा फायदा मिळणार आहे. गारपिटीने सर्वाधिक नुकसान अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम या झोनमधील १ लाख ८२ हजार ६६८ शेतकर्यांचे झाल्याची माहिती पुढे आली आहे. या जिल्ह्यातील वीज ग्राहक शेतकर्यांचे २४ कोटी ५ लाख रूपयांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. त्यासोबतच वीज वितरण कंपनीच्या इतर तीन विभागातील १ लाख ४८ हजार २९६ शेतकर्यांचे नुकसान झाले त्याही शेतकर्यांचे वीज देयके माफ करण्यात आली आहे.
गारपीटग्रस्तांचे ९२ कोटींचे वीज देयक माफ
By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST