रॉकेट उडाले,गो दा म जळाले
By Admin | Updated: November 26, 2015 03:09 IST2015-11-26T03:09:30+5:302015-11-26T03:09:30+5:30
इतवारी तीननल चौकाजवळील मच्छीसाथ येथे तीन माळ्याच्या इमारतीच्या वरच्या माळ्यावर असलेल्या फोम गोदामाला बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. ..

रॉकेट उडाले,गो दा म जळाले
नागपूर : इतवारी तीननल चौकाजवळील मच्छीसाथ येथे तीन माळ्याच्या इमारतीच्या वरच्या माळ्यावर असलेल्या फोम गोदामाला बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. तब्बल सव्वा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीत गोदाम पूर्णपणे जळाले, पण सुदैवाने जीवहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार फटाक्यामुळे (रॉकेट) आग लागली. प्रत्यक्षदर्शी बाबा रंभाड आणि लीलाधर भिसीकर यांनी लोकमतला सांगितले की, काही लोकांकडे तुळशीविवाहचा कार्यक्रम होता. त्यांनी उत्सव साजरा करताना फटाके फोडले आणि रॉकेट आकाशात उडविले. त्यावेळी गोदामाची खिडकी उघडी होती. एक रॉकेट त्या खिडकीतून आत शिरले. त्या गोदामात असलेल्या फोममुळे आगीने उग्र रूप धारण केले.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतु परिसरात वायरिंगचे मोठे जाळे असल्यामुळे गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. आग लागल्यानंतर गाड्या पाऊण तासानंतर घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीही अब्दुल मलिक यांच्या दुकानाला दोनदा आग लागली आहे. या आगीमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली.
ज्या इमारतीला आग लागली त्याच्या तळमाळ्यावर श्वेता सेंटर, साईबाबा मेटल स्टोर ही दुकाने आहेत. पहिल्या माळ्यावर गांधीबाग सहकारी बँकेचे कार्यालय आहे. आगीच्या घटनेनंतर बँकेतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात खराब झाल्याची माहिती आहे. यावेळी आगीमुळे होणारा अनर्थ लक्षात घेता एसएनडीएलच्या वतीने सोख्ता भवन आणि होलसेल क्लॉथ मार्केट येथील फीडर बंद करण्यात आल्याचे एसएनडीएलच्या प्रवक्त्याने सांगितले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बहादुरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
९०० घरांचा वीजपुरवठा खंडित
आगीच्या या घटनेनंतर एसएनडीएलने निवासी भागातील ट्रान्सफॉर्मर बंद केले. त्यामुळे या भागातील ९०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
महापौरांना घेराव
घटनेची माहिती मिळताच महापौर प्रवीण दटके घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नागरिकांनी त्यांना १५ ते २० मिनिटे घेराव घातला. रहिवासी परिसरात ज्वलनशील पदार्थांच्या गोदामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.
मदतीसाठी धावून आले नागरिक
आगीच्या घटनेची माहिती इतवारी परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. यादरम्यान अनेक लोक मदतीसाठी धावून आले. कुणी अग्शिमन दलाला फोन केला तर कुणी पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अमोल ठाकरे, सूरज गोजे, गुड्डू टक्कामोरे, हरभगवान नागपाल आदींसह परिसरातील अनेक लोकांनी आग विझविण्यासाठी मदत केली.