रस्ते, गडरलाइनमुळे चांदमारीवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST2021-03-08T04:07:56+5:302021-03-08T04:07:56+5:30
नळलाइन नाही : रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत आहे. शहरातील नागरिकांना अनेक ...

रस्ते, गडरलाइनमुळे चांदमारीवासी त्रस्त
नळलाइन नाही : रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी
नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत आहे. शहरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील चांदमारी नगरातील नागरिकांना मात्र मूलभूत समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील नागरिक पाणी, गडरलाइन, रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रारी करूनही काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नळलाइन नसल्यामुळे नागरिक त्रस्त
चांदमारीनगरात नळलाइन नाही. या भागात महापालिकेने नळलाइन टाकली. परंतु नागरिकांना नळाचे कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या भरवशावर अवलंबून रहावे लागत आहे. टँकरही नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना नळ कनेक्शन देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
रस्त्यांची अवस्था बिकट
चांदमारीच्या मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. चांदमारीनगरातील अंतर्गत रस्तेही मातीचे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचलेले असते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचतो. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविण्यात अडचणी येतात. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होते. त्यामुळे या भागात डांबरीकरण करण्याची मागणी आहे.
सफाईचा अभाव
सफाई कर्मचारीच येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे या भागात जागोजागी कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे या भागात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते. महापालिकेने या भागात सफाई कर्मचारी नियमित पाठविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याशिवाय परिसरात रिकामे प्लॉट आहेत. या प्लॉटवर कचरा साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात येते. महापालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करावे
‘चांदमारीनगरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मातीचे रस्ते असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते. वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होते. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी आहे.’
-शेख कदीर, नागरिक
नळ कनेक्शन द्यावे
‘नळलाइन टाकण्यात आलेली असून, नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. महापालिकेने नागरिकांना त्वरित नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’
-वनिता करंडे, नागरिक
सफाई कर्मचारी पाठवावेत
‘सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला असतो. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची मागणी आहे.’
-प्राजक्ता बिरुले, नागरिक
रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी
‘रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचत असल्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे महानगरपालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी.’
‘मोहन काटेकर, नागरिक
रस्त्यांचे डांबरीकरण करावे
‘मातीचे रस्ते असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते. पावसाळ्यात नागरिकांना चिखलातून चालण्याची पाळी येते. त्यामुळे महापालिकेने या भागात डांबरीकरण करण्याची गरज आहे.’
-जयंती सोनवाणी, नागरिक
नियमित सफाई व्हावी
‘सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला असतो. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात सफाई कर्मचारी पाठवून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-हिरा माटे, नागरिक
रिकाम्या प्लॉटमध्ये साचतो कचरा
‘रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.’
-मंजू सोळंकी, नागरिक
..................