रस्ते ठरताहेत जीवघेणे
By Admin | Updated: September 2, 2016 02:48 IST2016-09-02T02:48:38+5:302016-09-02T02:48:38+5:30
गेल्या दोन दिवसात शहरातील रस्ते अपघातात महिला व प्रसिद्ध डॉक्टरसह पाच जणांचे बळी गेले.

रस्ते ठरताहेत जीवघेणे
दोन दिवसांत पाच जणांचे बळी : जड वाहनांवर हवे नियंत्रण
नागपूर : गेल्या दोन दिवसात शहरातील रस्ते अपघातात महिला व प्रसिद्ध डॉक्टरसह पाच जणांचे बळी गेले. यामुळे वाहनधारकात भीतीचे वातावरण आहे. जड वाहनांची वाढलेली वर्दळ व वाहतूक नियमांचे होणारे सर्रास उल्लंघन ही अपघातांची कारणे असली तरी सर्वाधिक अपघात रस्त्यांमुळे होत आहेत. शहरातील रस्ते जीवघेणे ठरत असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील रस्ते उखडतात. रस्त्यावर पसरलेली गिट्टी व खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहने स्लीप होऊ न अनेकदा अपघात घडतात. सोबतच शहरात मोठ्याप्रमाणात सुरू असलेल्या विकास कामांमुळे जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. रिंगरोड सोबतच अंतर्गत रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी शहरात वर्दळीच्या कालावधीत जडवाहनांना प्रवेश बंदी करण्याची आवश्यकता आहे. जड वाहनांना प्रामुख्याने रात्रीच्यावेळी शहरात प्रवेश द्यावा. वाहनधारकांकडून वाहतूक सिग्नल तोडण्याचे प्रकार वाढले आहेत. झ्रेब्रा क्रॉसिंगचा वापर केला जात नाही. भरधाव गाडी चालविणे. अशा कारणांमुळे अपघातात भर पडत आहेत. तसेच अपघातात बळी ठरलेल्यापैकी किती जणांनी हेल्मेट घातले होते. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.
झेब्रा क्रॉसिंग व पट्ट्यांचा अभाव
नागपूर : चौकातील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग व पट्टे असायलाच हवे. परंतु शहरातील वर्दळीच्या सिग्नलवर याकडे दुर्लक्ष आहे. अपघात झालेल्या मानेवाडा व ओमनगर चौकातील सिग्नलवर झेब्रा क्र ॉसिंग व पिवळे पट्टे नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिक थांबण्याची रेषा ओलांडून वाहन थांबवितात. यामुळे अनेकदा अपघात होतात. शताब्दीनगर, मानेवाडा चौक यासारख्या ठिकाणी तर हमखास असे प्रकार घडताना दिसून येतात.
सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यक
गेल्या काही दिवसात अपघातातील बळींचा विचार करता यातील किती जणांनी हेल्मेट घातले होते याचाही विचार करण्याची गरज आहे. वाहनचालकांनी स्वत: विषयी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्यासोबतच हेल्मेट घालणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)